पुणे-: कपडे खरेदीसाठी लक्ष्मी रस्त्यावर दालनांची रेलचेल आहे. यामुळे दिवाळीनिमित्त ग्राहकांनी शनिवारी या भागात गर्दी केली होती.
पुणे – दिवाळी म्हणजे आनंद आणि उत्साह. हाच उत्साह द्विगुणीत करण्यासाठी नागरिक कपडे, वस्तू, खरेदीसाठी दिवाळीपूर्वीच्या अंतिम शनिवारी सकाळपासूनच घराबाहेर पडले. त्यामुळे मध्यवस्तीतील बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी झाली. या वातावरणामुळे व्यापारी बांधवांमध्ये समाधान दिसून आले.
दिवाळीत कपडे, दागिने, सजावटीचे साहित्य, आकाशकंदील, फटाके, फराळाचे साहित्य, मिठाई, सुका मेवा, पूजेचे साहित्य, इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. या सर्व वस्तूंच्या होलसेल बाजारपेठा मध्यवस्तीत आहेत. त्यामुळे दरवर्षी दिवाळीच्या काही दिवस आधी पुणे शहर आणि उपनगरांसह लगतच्या गावांतील नागरिक मोठ्या संख्येने मध्यवस्तीत येतात.
दरम्यान, शनिवारी सकाळपासूनच लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, केळकर रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, जंगली महाराज रस्ता, फर्गसन महाविद्यालय या प्रमुख रस्त्यांवर ग्राहकांची वर्दळ दिसून आली.
परिसरानुसार खरेदी
लक्ष्मी रस्त्यांवरील कपडे बाजार, सराफी बाजार, तुळशीबागेत पूजेचे साहित्य, सजावटीचे साहित्य, बोहरी आळीत विविध प्रकारच्या वस्तू, महात्मा फुले मंडईत पूजेच्या साहित्य, तर गुरूवार पेठेते भांडे खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. त्यामुळे मोठी उलाढाल होत असल्याचे दिसून आले.
हॉटेल “हाऊसफुल्ल’
खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी दुपारच्या वेळेत भोजनासाठी गर्दी केली. त्यामुळे परिसरातील बहुतांश हॉटेलमध्ये रात्रीपर्यंत “वेटिंग’ होते. शिवाय, मधल्या वेळेत चटकदार पदार्थांवर ताव मारण्यासाठी चाट भांडार, समोसा-वडापाव-पॅटिसवर ताव मारण्यासाठी कुटुंबे दाखल झाली होती. तर, पेठांमधील प्रसिद्ध असणाऱ्या मिसळीचा आस्वाद घेण्यासाठी रांगा दिसून आल्या.
रात्री उशिरापर्यंत वाहतूक कोंडी
एकाच वेळी वाहनांची तसेच नागरिकांची संख्या वाढल्याने बाजारपेठांत गर्दी, तर रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असते. त्याचाच प्रत्यय शनिवारीही आला. मध्यवस्तीत कोंडी झाल्याने अनेक वाहन चालकांनी छोट्या रस्त्याने वाहने वळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठ्या आणि छोट्या रस्त्यांवरही प्रचंड वाहतूक कोंडी झाली. रात्री उशिरापर्यंत वाहतूक कोंडी कायम होती.
शिस्त गरजेची, पण…
त्यात जागा मिळेल त्या ठिकाणी लावलेल्या गाड्या, नो एंट्रीत प्रवेश करणे, एक जण गाडीत थांबून गाडी रस्त्यावर उभी करणे, पोलिसांकडून अपेक्षित कारवाई न झाल्यामुळे गर्दीत भर पडला. मोठ्या रस्त्यांसह छोटे रस्तेही वाहतूक कोंडीत हरवले. त्यामुळे दिवसभर पायी चालतानाही नागरिकांना अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली.
पायी चालणेही कठीण
बऱ्याच ठिकाणी लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्याने वाहन अनेकांना तासनतास वाहतूक कोंडीत थांबून हॉर्नचा कर्णकर्कश आवाज सहन करावा लागला. शिवाय, रस्त्याकडेच्या दुकानदारांनाही त्रास सहन करावा लागला. दुपारनंतर वाहनांची गर्दी वाढत गेल्याने जिकडे तिकडे वाहनेच दिसून येत होती. या स्थितीमुळे पायी चालणेही कठीण झाले होते.