नवी दिल्ली : देशातील करोनाची दुसरी लाट आता हळूहळू ओसरताना दिसत आहे. मात्र लोकांच्या मनातील भीती अजूनही तशीच असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोणावरही विश्वास ठेवून कोणत्याही औषधांचे सेवन करण्यात येत आहे. याच गोष्टीचा फायदा घेत तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे.
करोना औषधाच्या नावाखाली विषाच्या गोळ्या देत तिघांचे आयुष्य संपवल्याची क्रूर घटना घडली आहे. यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. कर्ज घेतलेल्या पैशांमुळे ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. विषबाधा झालेल्या कुटुंबाने एका व्यक्तीला कर्ज दिले होते. जेव्हा कुटुंबाने पैशाची मागणी केली. तेव्हा त्याने हे कृत्य केले आहे.
तामिळनाडूच्या इरोडमध्ये ही घटना घडली आहे. करुप्पनकाउंडर यांनी काही महिन्यांपूर्वी आर कल्याणसुंदरम नावाच्या व्यक्तीला 15 लाख रुपये दिले होते. करुप्पनकाउंडर यांनी गरज असल्यामुळे कल्याणसुंदरमकडे पैसे परत मागितले. पैशांची परतफेड करू न शकल्यामुळे कल्याणसुंदरम यांनी करुप्पनकाउंडर आणि त्याच्या कुटुंबाला संपवण्याचा कट रचला. कल्याणसुंदरम यांनी सबरी नावाच्या व्यक्तीसोबत एक योजना आखली. यात साबरी यांना आरोग्य विभागाचा कर्मचारी बनवून करुप्पनकाउंडर यांच्या घरी पाठविण्यात आले.
26 जूनला तिथे जाऊन सबरीने करुप्पनकाऊंडरला विचारले की, कुटुंबातील कोणालाही खोकला, सर्दी इ. आहे का? यानंतर सबरीने जाताजाता काही विषाच्या गोळ्या करुप्पनकाऊंडरकडे दिल्या. यावेळी सबरीने रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हे औषध असल्याचे सांगितले.
सबरी गेल्यानंतर करुप्पनकाऊंडर, त्यांची पत्नी, मुलगी आणि घरात काम करणाऱ्या एका महिलेने त्या गोळ्या घेतल्या. त्यानंतर ते चौघेही बेशुद्ध झाले. शेजार्यांनी तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तसेच करुप्पनकाऊंडरची पत्नी मल्लिका, मुलगी दीपा आणि काम करणारी महिला कुप्पल यांचा रुग्णालयातच मृत्यू झाला.