जयपूर : सरकारी किंवा खासगी कार्यालयात सर्वसामान्यांची कामे मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांची मनधरणी करावी लागते. त्यासाठी आजकाल सर्रासपणे लाच घेण्याचे आणि देण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र लाच देण्याची ज्यांची परिस्थिती नसते त्यांच्यासाठी हे सर्व कठीण होऊन जाते. अशीच एक घटना राजस्थानमध्ये घडली आहे. अधिकाऱ्याला लाच देण्यासाठी एका शेतकऱ्याने चक्क आपल्या पोटच्या मुलांना गहाण ठेवेले असल्याचे धक्कादायक घटना उघड झाली आहे.
ही घटना राजस्थनाच्या जोधपूर येथे घडली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या जिल्ह्यात ही घटना घडल्याने संताप व्यक्त होत आहे. राजस्थानमधल्या या घटनेने देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. जोधपूरमधील फलौदी येथील काही शेतकऱ्यांनी जमिनी वाटणीच्या कामासाठी अर्ज केला होता. मात्र तहसीलदारांनी दोन लाख रुपयांची लाच मागितली, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
शेतकऱ्यांसाठी तहसीलदारांना देण्यासाठी दोन लाख रुपये नव्हते, त्यामुळे त्यांनी आपल्या पोटच्या नऊ मुलांना तहसीलदारांकडे ठेवलं आणि तिथून निघून गेले. त्या मुलांनी कालची रात्र तहसीलदारांकडेच काढली. फलौदी तालुक्यातल्या ढढू गावातले १३ शेतकरी आक्रमक झाले होते. त्यामुळेच त्यांनी ९ मुलांना रात्रभर तहसील कार्यालयात गहाण ठेवले आहेत. घटनेची माहिती कळताच घटनास्थळी एसडीएम आणि महसूलचे वरिष्ठ अधिकारी पोहोचले.
याप्रकरणी कुठल्या अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याची माहिती नाही. हे प्रकरण १९९८ पासूनचं असल्याची माहिती मिळत आहे. तहसीलदाराने या कामासाठी प्रत्येकी २ लाख रुपयांची लाच मागितल्याचा गंभीर आरोप आहे.