लोणावळा, (वार्ताहर) – पक्ष स्थापनेपासून पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची दखल पक्षाकडून घेतली जात नाही, कार्यकर्त्यांवर दबाव टाकला जातो, कोणाशीही चर्चा न करता निर्णय घेतले जातात, कार्यकर्त्यांवर अन्याय केला जातो, जाणूनबुजून कार्यकर्त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जाते,
त्यांच्या भावना समजून घेतल्या जात नाही, असे असंख्य आरोप करीत लोणावळा शहरातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा राजीनामा गुरुवारी दिला. त्यांचा हा राजीनामा राष्ट्रवादी अजित पवार गट आणि आमदार सुनील शेळके यांना धक्का समजला जात आहे.
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवार गटाच्या लोणावळा शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी असलेल्या विनोद होगले यांना कोणतीही कल्पना न देता तडकाफडकी पदावरून दूर करून मंगेश मावकर यांची युवक अध्यक्षपदी निवड जाहीर केली होती. तेव्हापासूनच लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत खदखद सुरू झाली होती.
त्यानंतर गुरुवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या १२२ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपले राजीनामे पक्षाकडे देत नाराजी व्यक्त केली. तसेच आपली पुढील भूमिका लवकरच जाहीर करू असेही यावेळी या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
प्रांतिक सदस्य यशवंत पायगुडे म्हणाले की, पक्ष संघटनेत प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची पक्ष नेतृत्वाकडून दखल घेतली जात नाही, त्यांच्या प्रामाणिकपणावर शंका घेतली जाते, त्यांच्यावर अन्याय केला जातो ही खंत मनात आहे. काम करताना काही चुका होतात. त्यासाठी सरळ पदावरून दूर करणे हा पर्याय नाही.
आपलेच लोक आपल्याला सहाय्य करीत नसेल तर तेथे किती दिवस राहायचे असा प्रश्न लोणावळा शहर युवकचे कार्याध्यक्ष अजिंक्य कुटे यांनी यावेळी उपस्थित केला.
ज्यांनी कर्ज काढून पक्षाच्या वाढीसाठी काम केलं, कार्यक्रम घेतले त्यांच्यावर पक्षाकडून अन्याय केला गेला आहे, असे जिल्ह्याचे युवक सरचिटणीस अमोल गायकवाड यांनी सांगितले. खरेदीविक्री संघाच्या निवडणुकीत पक्षाचे दत्ता गोसावी यांची बिनविरोध निवड होत असताना अर्ज मागे घ्यायला लावून बिनविरोध निवड जाहीर केली जाते.
राजीनामा दिलेले काही मुख्य पदाधिकारी ः यशवंत पायगुडे (प्रांतिक सदस्य), राजू बोराटी (जिल्हा उपाध्यक्ष) , अमोल गायकवाड (जिल्हा युवक सरचिटणीस) , किरण पाळेकर, संतोष कचरे, ज्ञानेश्वर येवले, सोमनाथ गायकवाड, रिझवान खान, यश रिले, कुणाल सिसोदिया, महेश गाडे, दत्ता गोसावी, रमेश दळवी, आदिल शेख, अजय गोदिया, प्रवीण करकेरा, फिरोज शेख, शेखर खिल्लारे, रवी भोईने, गायत्री रिले, नेहा पवार, विनोद होगले, अजिंक्य कुटे, अजिंक्य ढोरे, राकेश अंभोरे, तुषार पाडाळे, मंगेश गोसावी, तुषार शेळके, आकाश काळे, आनंद क्षीरसागर, प्रसाद राऊत, साहिल खान, पावन मालपुटे, आदेश अंभोरे आदी.