कोपरगाव, (प्रतिनिधी)- कोपरगाव तालुक्यातील उबाठा सेनेचे नितीनराव औताडे, बाळासाहेब रहाणे , संजय गुरसळ यांच्या राजीनाम्यानंतर काल पुन्हा उबाठा शिवसेनेच्या कोपरगाव विधानसभा समन्वयक पदाचा राजीनामा अभिषेक राजेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. उबाठा सेनेच्या राजीनामाचे सत्र सुरू असल्याने पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
त्यांनी राजीनाम्याचे पत्र मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवले आहे. बाल शिवसैनिकापासून ते उबाठा शिवसेनेत ते कार्यरत होते. युवा सेनेच्या तालुका प्रमुख पदी असताना त्यांनी तरुणांचे संघटन करून पक्षाची ताकद वाढवली होती. कोपरगाव येथील युआरच्या महाविद्यालयीन निवडणुकीमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीत विजयी केले होते. कोपरगाव शहरासह तालुक्यात त्यांची वेगळी ओळख आहे.
औताडे यांचे ते खंदे समर्थक असल्याने त्यांनीही उबाठा सेनेला रामराम ठोकला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामावर प्रभावित होऊन मार्गदर्शक नितीनराव औताडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सर्वांना बरोबर घेत काम करण्याची त्यांची पद्धत मला भावली असून मी देखील माझ्या पदाचा राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले.