चंदीगड : पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या मोठ्या विजयानंतर भगवंत मान यांनी राज्याची सत्ता हाती घेतली. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भगवंत मान यांनी जनतेच्या कल्याणासाठीचे निर्णय घेण्याचा धडका लावला असतानाच आर्थिक बचतीबाबतही मोठा निर्णय घेतला आहे.
पंजाबमध्ये आता आमदारांना एकच पेन्शन मिळणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. याअंतर्गत आमदारांच्या पेन्शन फॉर्म्युल्यात बदल होणार आहे. पंजाबमध्ये आतापर्यंत अशी व्यवस्था होती की, एखादी व्यक्ती जेवढ्या वेळा आमदार होईल, त्याची पेन्शन वाढत होती. परंतु आता एखादी व्यक्ती कितीही वेळा आमदार झाली, तरी त्याला पेन्शन एकाच टर्मची मिळणार आहे.
दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने नुकताच ३०० आमदारांना घर बांधून देण्याचा निर्णय घेतला आहे. बहुतांशी आमदारांकडे भरपूर संपत्ती आहे. तरी देखील त्यांना घरं देण्याचा निर्णय घेणे आश्चर्यकारक आहे. त्याचवेळी पंजाब सरकारने पेन्शन कमी करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचं कौतुक होतय.
खुद्द मुख्यमंत्री मान यांनी व्हिडीओ शेअर करून या संदर्भातील निर्णय घेतल्याची माहिती दिली. ते म्हणाले अनेक आमदारांना अनेक टर्मची मिळवून महिन्याला पाच लाखांपर्यंत पेन्शन मिळत होती. आता कितीही वेळा आमदार झाले तरी त्या नेत्याला केवळ एका टर्मची पेन्शन देण्यात येईल.
तत्पूर्वी मुख्यमंत्री झाल्यानंतर मान यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्याच्या बिकट आर्थिक स्थितीचा दाखला देत त्यांनी पंजाबसाठी पंतप्रधान मोदींकडे एक लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची मागणी केली होती. ते म्हणाले की, दरवर्षी 50 हजार कोटींनुसार पंजाबला पुढील दोन वर्षांसाठी 1 लाख कोटी रुपयांची गरज आहे.
दरम्यान पंतप्रधानांनी अर्थमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर पंजाबला सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन दिले होते. यासोबतच मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना राष्ट्रीय सुरक्षेसाठी पंजाब सरकारला सहकार्य करण्याची विनंतीही केली आहे.