पिंपरी – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेमध्ये मुंबई महापालिकेत मोठा भ्रष्टाचार होत असल्याची टीका केली. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांचे सर्व आरोप खोडून काढले. तसेच मुंबई पालिकेत भ्रष्टाचार झाला असे भाजप म्हणतेय मग भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये काय? असा सवाल देखील ठाकरे यांनी विधानसभेत उपस्थित केला.
महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना विरोधक जाणूनबुजून अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगत मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांवर तोफ डागली.
ते म्हणाले, सरकारी यंत्रणाचा गैरवापर करून सरकारमधील नेत्यांना अडचणीत आणले जात आहे. माझ्या कुटूंबियांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुमचा रोष माझ्यावर आहे तर मी तुमच्या बरोबर येतो मला तुरुंगात टाका. काल फडणवीस यांनी मुंबई पालिकेत मोठा घोटाळा होत असल्याचा आरोप केला. मात्र मुंबई पालिकेने गेल्या अनेक वर्षात खूप चांगले निर्णय घेतले आहेत.
कोविड काळात पालिकेने सर्वोत्तम काम केले, असे असताना मुंबई पालिकेच्या कारभारावर विरोधक भ्रष्टाचाराचे आरोप करतात. मग भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेचे काय? असा सवाल मुख्यमंत्री ठाकरे यांनी उपस्थित केला.