पुणे – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फारकत घेत माजी राज्यमंत्री तथा पुरंदर-हवेलीचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी एकनाथ शिंदे गटाशी घरोबा केला. पुणे जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नसल्याने किमान शिंदे गटाशी घरोबा केला तर राज्यपाल नियुक्त आमदारकी आणि फडणवीस सरकारमध्ये राज्यमंत्री पद भूषवल्याच्या अनुभवावर मंत्रीपद मिळेल या इच्छाशक्तीवरच शिवतारेंनी शिवसेनेशी प्रतारणा केली असल्याची चर्चा शिवसैनिकांसह राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पक्षाच्या विरोधात काम केल्याने आणि पक्षाची शिस्त मोडल्यानंतर विजय शिवतारे यांना शिवसेनेने बाहेरचा रस्ता दाखवत अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. शिवतारे यांचे शिवसेना सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याशी त्यांचे राजकीय वैमनस्य असून राज्यात महविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर ही त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला विरोधी भूमिका घेतली होती. शिवसेनेत बंडखोरी झाल्यावर विजय शिवतारे यांनी एकनाथ शिंदे गटाला समर्थन दिल्यानंतर त्यांच्यावर हकालपट्टी कारवाई करण्यात आली आहे.
शिवतारे शिंदे गटात गेल्यामुळे विजय शिवतारे समर्थक आणि इतर शिवसैनिक यांच्यात वादाची ठिणगी पडण्याची शक्याता आहे. दोन्ही गटांनी वेगवेगळी भूमिका घेतल्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. अशातच ज्यांना विजय शिवतारे यांची भूमिका मान्य नाही, त्यांना व्हॉट्सऍप ग्रूपमधून वगळा, असे आदेश मिळले आहेत. तर पुरंदर तालुक्यातील गावागावांत बनवण्यात आलेल्या व्हॉट्सऍप ग्रुपमधून शिवतारे यांच्या भूमिकेला बगल देणाऱ्यांना काढून टाकले जात असल्याने शिवसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय निर्णय देणार याकडे निष्ठावान शिवसैनिकांचे लक्ष असून त्यांनी “वेट अँड वॉच’च्या भूमिका घेतली आहे.
विजय शिवतारे जरी शिंदे गटात गेले असले तरी त्यांच्या मागील शिवसेनेचे वलय नाहीसे झाले असून ते केवळ राज्यपाल नियुक्त आमदार आणि पुन्हा मंत्रीपदाच्या आशेने त्यांनी शिवसेनेशी फारकत घेतली असली तरी त्यांना आमदारी आणि मंत्रीपद मिळेल, अशी आशा धुसर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
ठाकरे घराण्याचे वलय म्हणून…
विजय शिवतारे यांच्या भोवती केवळ शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या ठाकरे नावाच्या वलयामुळे ते आमदारकी आणि राज्यमंत्री पदापर्यंत मजल मारली होती; मात्र अतिबोलण्याचा आणि विकासकामांकडे दुर्लक्ष केल्याने त्याचा परिणाम 2019च्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले; त्यावेळी ठाकरे घराण्याचे वलयही त्यांच्या कामी येणार नाही हे जनतेने दाखवून दिले; आता तर त्यांनी थेट ठाकरे घराण्याशी फारकत घेतल्याने निष्ठावान शिवसैनिक त्यांना त्यांची जागा दाखवतील, असा संदेश जिल्हाध्यक्षांनी दिला असल्याने आगामी काळात शिवतारेंच्या राजकीय अस्तित्वाची कसोटी लागणार हे मात्र निश्चित!