पुणे – शिवशाही बसच्या कासवगती आणि बेशिस्त कारभारावर प्रवाशांकडून वारंवार तक्रारींचा पाढा वाचला जात आहे. पुणे शहरातील मध्यवर्ती बस स्थानकातून बहुतांश वेळा एक ते दीड तास उशिरा बस सुटत असल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शिवाजीनगर, स्वारगेट बस स्थानकांतील प्रवाशांनी शिवशाहीचा धसका घेतला आहे. या बसेस उशिरा सुटत असल्याने प्रवासी स्थानकात वेळेवर पोचूनही ताटकळत थांबतात. अनेकदा बस दुरुस्तीसाठी गेल्याचे कारण ऐनवेळी देऊन साध्या बसने जाण्यास सांगितले जाते. ही परिस्थिती पुण्यापुरतीच नसून राज्यभरात असल्याने एस.टी प्रशासनाने कारभार सुधारण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे.
अपघात वाढले
आरमदायी अशी ओळख असलेल्या शिवशाही बसला अपघाताचे ग्रहण लागले आहे. सध्या एस.टी महामंडळाच्या ताफ्यात एक हजाराहून अधिक शिवशाही बसेस आहेत. मात्र, अपघाताचे वाढते प्रमाण व इतर अनागोंदीचे प्रकार पाहून शिवशाहीच्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे.
आरक्षित प्रवाशांचे आर्थिक नुकसान
शिवशाही बस अचानक रद्द करण्याचे प्रकार वाढले आहेत. एखाद्या प्रवाशाने आगाऊ आरक्षण केल्यानंतर बस रद्द झाल्यास प्रवाशांना साध्या बसने प्रवास करण्यास सांगितले जाते. त्यावेळी शिवशाहीचे तिकीट साध्या बसहून जास्त असताना दोन्ही बसच्या तिकिट दरातील फरकाचे पैसे प्रवाशांना दिले जात नाहीत. या प्रकारामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.
शिवाजीनगर स्थानकातून लातूरला जाण्यासाठी माझा सतत प्रवास असतो. मात्र, बहुतांश वेळा स्थानकातून शिवशाही वेळेवर सुटत नाही. यामुळे ताटकळत थांबावे लागते. याचबरोबर आगाऊ आरक्षण केल्याने दुसऱ्या बसनेही प्रवास करता येत नसल्याने खोळंबा होतो.
– ऍड. गणेश देशमुख, प्रवासी