मुंबई – निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आणि पक्षाचे नाव तात्पुरत्या स्वरूपात गोठवण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्या निर्णयाला शिवसेनेने ( ठाकरे गट ) हायकोर्टात आव्हान दिले आहे. दिल्ली हायकोर्टात ही याचिका दाखल करण्यात आली असून त्यात नमूद करण्यात आले आहे की निवडणूक आयोगाने आम्हाला पर्यायी नावे आणि चिन्हे सुचवण्यासाठी पुरेसा वेळही दिला नाही.
शिवसेनेच्या दोन्ही गटांना तात्पुरत्या स्वरूपात निवडणूक चिन्हे आणि पर्यायी नावे तातडीने देण्याची सुचना आयोगाने केली होती. त्यामुळे दोन्ही गटांच्या नेत्यांची चांगलीच धावपळ झाली. मुळात हा जो निर्णय घेतला गेला आहे त्यालाच शिवसेनेचा ( ठाकरे गट ) आक्षेप आहे.
त्यामुळे त्यांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावण्याचा मार्ग स्वीकारला आहे. पक्षाने या निर्णयाबद्दल निवडणूक आयोगावर चांगलीच आगपाखड केली आहे. केवळ आगपाखड करूनच हा पक्ष थांबलेला नाही तर त्यांनी आता आयोगाला कोर्टातही खेचले आहे.