Lok sabha election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीतील पक्षांचं लोकसभा मतदार संघाचं वाटप नेमकं कसं असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अगदी त्याच प्रमाणे महायुतीतील पक्षांमध्ये देखील जागा वाटपाबाबत काय समीकरण असणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.अशात आता भाजप आणि शिंदे गटामध्ये धुसपूस सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपाला सर्व पक्षांना संपवून एकट्यालाच जीवंत राहायचं आहे का ? असा सवाल शिंदे गटाच्या नेत्याने जागा वाटपावरून उपस्थित केला आहे.
रत्नागिरी मतदारसंघ मिळावा यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्न करत आहे यावरून शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तुम्ही (भाजपा) रायगडमध्ये सांगाल आम्हीच ,उद्या म्हणाल रत्नागिरीतही आमचीच जागा.. ” असं होत नसत अशा शब्दात कदम यांनी भाजपला सुनावले आहे.
रत्नागिरीत आमचा उमेदवार निवडून आला आहे. त्या जागेवर पूर्णपणे शिवसेनेचा अधिकार आहे. तुम्ही रत्नागिरीची जागा मागाल, रायगडची जागा मागाल, तुम्हाला (भाजपाला) सर्व पक्षांना संपवून एकट्यालाच जीवंत राहायचं आहे का ? असा जळजळीत सवाल देखील रामदास कदम यांनी यावेळी उपस्थित केला.
आम्ही आमच्या हक्काची जागा का सोडावी? आमच्या या भूमिकेमुळे युतीत अजिबात फूट पडणार नाही. प्रत्येकाला वाटतं की, माझा पक्ष मोठा झाला पाहिजे. त्यामुळे असा विषय काढून प्रयत्न केला जातो. असंही रामदास कदम यांनी यावेळी सांगितले. कुठल्याही परिस्थिती रत्नागिरीची जागा आम्ही सोडणार नाही. ती जागा आम्ही लढवणारच. ती आमच्या हक्काची जागा आहे. तिथे आमचा उमेदवार निवडून आला आहे असं देखील यावेळी रामदास कदम यांनी ठणकावून सांगितले.