रायगड (विशेष प्रतिनिधी) : छत्रपती शिवरायांचे स्वराज्य पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी येथे केले. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्यात ते बोलत होते. त्यांच्या व शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते मेघडंबरीतील शिवछत्रपतींच्या पुतळ्यावर शिवराई सुवर्ण होनच्या प्रतिकृतींचा अभिषेक घालण्यात आला.
यावेळी कॉन्झर्व्हेटिव्ह ऑफिसर वरुण भामरे यांचा सत्कार करण्यात आला. राजसदरेवर कार्यक्रम झाला. दरम्यान, शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शिवप्रेमींनी गडावर अलोट गर्दी केली. पालखी सोहळ्यात हजारो शिवप्रेमींनी सहभाग घेतला. महिलांनी झिम्मा-फुगडीचा फेर धरत सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
संभाजीराजे म्हणाले, “सरकारने शिवभक्तांच्या सोयी-सुविधांसाठी काय केले, या प्रश्नाचे उत्तर द्यावे. केवळ शिवछत्रपतींच्या दर्शनासाठी कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता गडावर येणारा शिवभक्त आहे. त्यांना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी शिवराज्याभिषेक समिती दिवस रात्र राबते. शासन शिवभक्तांची दखल घेणार नसेल तर स्वराज्यासाठी लढा येथूनच सुरू केला जाईल.”
राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाज सुधारक व शिवभक्त होते. शिवाजी महाराज व ताराराणी यांचा रथोत्सव सुरू करण्याबरोबरच त्यांनी जगातील पहिला शिवछत्रपतींचा पुतळा उभारला. त्याच्या पायाभरणी साठी ब्रिटनच्या युवराजाला आमंत्रित करुन, त्याला शिवछत्रपतींसमोर नमवले, असे संभाजीराजे यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वाभिमानाशी कधी तडजोड केली नाही, असे सांगत ते म्हणाले की, “शिवरायांनी प्रस्थापितांना घेऊन स्वराज्य निर्माण केले नाही. तर विस्थापित मावळ्यांना एकत्र करून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या विरोधात अनेक पातशाह्या होत्या. त्या वेळी शहाजीराजे व शिवाजी महाराज यांच्यात भांडणे लावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, त्याची फारशी फिकीर न करता शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन केले. देशाला पहिले स्वातंत्र्य मिळवून दिले.” शहाजीराजे व शिवाजी महाराज यांनी कधीच स्वाभिमानाशी तडजोड केली नाही. पुरंदरच्या तहात शिवरायांनी दोन पावले मागे राहणे पसंत केले. त्यांनी कोणाचे मांडलिकत्व स्वीकारले नाही, असेही ते म्हणाले.
“युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी सोहळ्याला भेट देत शिवभक्तांशी संवाद साधला. गडावर स्वच्छता ठेवावी, असे आवाहन त्या करत होत्या. तसेच गडावरील प्लास्टिक पिशव्या व बाटल्या गोळा करण्याच्या सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.”
समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी प्रास्ताविक केले. दरम्यान, तत्पूर्वी सकाळी साडे नऊ वाजता जिल्हा परिषद शेड ते राजसदर मार्गे शिवछत्रपतींची पालखी मिरवणूक काढण्यात आली. राजसदरेवर संभाजीराजे व शहाजीराजे आल्यानंतर शाहिरांनी शाहिरी सादर करत वातावरण शिवमय केले.
शिवछत्रपतींच्या उत्सव मूर्तीवर जलाभिषेक व दुग्धाभिषेक झाल्यानंतर मेघडंबरीतील शिवछत्रपतींच्या पुतळ्यावर शिवराई सुवर्ण होनांचा अभिषेक झाला. राजसदर, नगारखाना, बाजारपेठमार्गे जगदीश्वर मंदिराकडे पालखी मिरवणूक काढण्यात आली. जगदीश्वर व शिवछत्रपतींच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर सोहळ्याची सांगता झाली.