कोल्हापूर – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा आज राज्यात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधत शिवरायांच्या मुर्तीला दुग्धाभिषेक करून त्यांचे आशिर्वाद घेत जोडप्याचा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु आहे.
राहुल माने आणि कोमल दिवसे अशी या नवविवाहित वधु वराची नावे आहेत. या लग्नाला कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनीही उपस्थिती लावली होती. त्यांनी या लग्नाचे फोटो त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करत नवदाम्पत्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
तर दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील नव वधू-वरानेही शिवरायांना अभिषेक घालून त्यानंतर लग्नकार्य पूर्ण केले. पन्हाळा तालुक्यातील आकुर्डे गावातील अभिजित पाटील आणि करवीर तालुक्यातील वाकरे गावातील वैष्णवी पाटील यांच्याही या अनोख्या विवाहाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यादिवशीच लग्न असल्याने शिवरायांचे स्मरण करून वधु-वर विवाहबंधनात अडकले.