जळोची- रोजंदारी व हातावरचे पोट असणाऱ्या गोरगरीब गरजू नागरिकांना लॉकडाऊन मध्ये शिवभोजन थाळी वरदान ठरत आहे. टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर हाताला काम नसणाऱ्या बारामतीतील शेकडो गरजू नागरिकांना शिवभोजन थाळी वरदान ठरत आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून आजपर्यंत या योजनेच्या माध्यमातून ७६ हजार ९२६ नागरिकांनी लाभ घेतला आहे.
राज्यातील कोणताही गोरगरीब गरजू नागरिक उपाशी झोपणार नाही. या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाने राज्यात ठिकठिकाणी शिवभोजन थाळी योजना सुरु केली आहे. बारामतीतील रोजंदारी हातावरचे पोट असणाऱ्या गरजू नागरिकांचा विचार करून बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती, कृषी उत्पन्न उपबाजार जळोची, बारामती तालुका दुध संघ न्यू अक्षदा मंगल कार्यालय, पान गल्ली, बारामती तालुका खरेदी विक्री संघ तांदुळवाडी, शाळा क्रमांक २, रयत भवन, माता रमाई भवन, सिद्धार्थनगर, अनंत आशा नगर अशा दहा ठिकाणी बारामती शहरात ही योजना राबविली जात आहे. शहरातील शेकडो गरजू नागरिकांना ही योजना वरदान ठरत आहे.