वीसगाव खोरे, (वार्ताहर) – छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या शिस्तबद्ध आणि आदर्श विचाराने कार्यक्षम प्रशासन स्थापन करून मराठी साम्राज्याचा पाया घातला. युद्धशास्त्रात अनेक नवनवीन संकल्पना रुजविल्या आणि गनिमी कावा युद्धाची एक नवीन शैली विकसित केली छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी स्थापन केलेले स्वराज्य हा भारताच्या इतिहासातील एक दैदीप्यमान अध्याय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय ध्येयधोरणे आजही आपल्या सर्वासाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन बाल कीर्तनकर आर्यन महाराज गोरड यांनी शिवजयंती निमित्त केले.
उत्रौली(ता.भोर) येथे एक गाव एक शिवजयंती, असा सोहळा साजरा करण्यात आला. उत्रौली गावातील तरुणांनी एकत्र येत एक गाव एक गणपती धर्तीवर गावातील सर्वांनी एकत्र येत महान राजा, अवघ्या मराठी मनाची अस्मिता, आराध्य दैवत, श्री छत्रपती शिवाजी महाराजांची ३९४ वी जयंती उत्साहात साजरी केली. सांस्कृतिक कार्यक्रम, ऐतिहासिक मराठी सिनेमा, किल्ले प्रतापगडाकडे प्रस्थान करण्यात आले.
सोमवारी (दि.१९) दुपारी १२ वाजता शिवज्योत आगमन झाले. किल्ले प्रतापगडावरून आणलेल्या शिवज्योतीचे महिला, तरुण,अबाल वृध्दांनी छत्रपती शिवरायांचे जयघोष करीत वाजत गाजत स्वागत केले, गावचे तंटामुक्ती अध्यक्ष भरत शिवतरे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. सायंकाळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात, मावळ्यांची वेशभूषेत, हर हर महादेव गर्जना, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जयघोषात गावातून मिरवणूक काढण्यात आली.