कामशेत (वार्ताहर) – जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची गट आणि गण रचना नुकतीच जाहीर केली आहे. पण या रचनेवर शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियोजित करण्यात आलेल्या गट, गण रचनेवर मावळ शिवसेना आपली भूमिका मांडण्यासाठी कामशेत येथे पत्रकार परिषदेचे आयोजित केली होते.
या वेळी बोलताना तालुका शिवसेना प्रमुख राजू खांडभोर यांनी तालुक्यातील सत्ताधारी पक्षावर आरोप केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्याला सोयीस्कर अशी रचना केल्याचा आरोप सांडभोर यांनी केला. कुसगाव-वरसोली हा गट शिवसेनेला अनुकूल असल्याने त्यात बदल केला असून त्यात अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतरावरील सोमाटने गाव समाविष्ट केल्याने भविष्यात निवडून येणाऱ्या उमेदवाराला काम करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन झालेल्या गट, गण रचनेत योग्य तो बदल केला पाहिजे, अशी शिवसेनेच्या वतीने मागणी केली.
याशिवाय नवीनच उल्लेख झालेल्या तळेगाव दाभाडे ग्रामीण गटाबाबतही संबंधित कार्यालयात पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगितले. या वेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शरद हुलावळे, उपतालुका प्रमुख सुरेश गायकवाड, डॉ. विकेश मुथा, आशिष ठोंबरे, शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
पहाटेच्या शपथविधीलाही गोमूत्र शिंपडले का?
तळेगाव नगर परिषदेच्या इमारतीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर मावळ तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्या जागेवर गोमूत्र शिंपडून उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर टीका केली होती. सदर प्रकरणात मावळ शिवसेनेची भूमिका काय आहे, हे पत्रकारांनी विचारल्यावर विधानसभेच्या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा पहाटे शपथविधी हा गोमूत्र शिंपडून केला होता का? असा खोचक प्रश्न उपस्थित करून मावळ भाजपच्या दुटप्पी धोरणाला अधोरेखित केले.