सातारा – मागील काही महिन्यांपासून प्रचंड उलथापालथी अनुभवणाऱ्या महाराष्ट्रातील राजकारणात शुक्रवारी अत्यंत महत्वपूर्ण आणि निर्णायक घडामोड घडली. शिवसेनेवर हक्क कुणाचा, या कळीच्या मुद्द्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने अंतिम निर्णय दिला. आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटावर खरी शिवसेना म्हणून शिक्कामोर्तब केले. तसेच, धनुष्यबाण हे चिन्हही शिंदे गटाला बहाल केले. भाजपच्या साथीने महाराष्ट्राची सत्ता सांभाळणाऱ्या शिंदे गटासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय सुखावणारा आहे.
त्याउलट, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या दृष्टीने तो निर्णय अतिशय धक्कादायक आहे. स्थापनेपासून शिवसेना म्हणजेच ठाकरे असे समीकरण होते. शिवसेना ठाकरेंचीच ही ओळख निवडणूक आयोगाच्या निर्णयाने पुसली जाणार आहे. यापुढे शिवसेना हा शिंदेंचा पक्ष म्हणून ओळखला जाईल. त्यामुळे शिवसेनेबाबत देण्यात आलेला निर्णय महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील ठळक घडामोडींपैकी एक म्हणून कायम कोरला जाईल.
दरम्यान या निर्णयावर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हंटले की, ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह वंदनीय बाळासाहेबांच्या आम्हा सच्च्या शिवसैनिकांचेच! निवडणूक आयोगाच्या आजच्या निर्णयाने लोकशाहीचा, सत्याचा विजय झाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली वंदनीय बाळासाहेबांचे ज्वलंत विचार जपण्यासाठी आम्ही काही महिन्यांपूर्वी उठाव केला. आम्ही सुरुवातीपासूनच सांगत होतो, की आम्ही नियमबाह्य काहीच केलेले नाही. निवडणूक आयोगाने आज त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. एका तत्त्वनिष्ठेने एकनाथ शिंदे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आम्ही घेतलेल्या भूमिकेला आज न्याय मिळाला आहे. यापुढेही वंदनीय बाळासाहेबांच्या विचारानुसार आम्ही जनसेवेत कायम कटिबद्ध आहोत, असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त करतो.