मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर निवडून जाण्यात अडथळे आणल्याचा आरोप करत शिवसेनेने राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपवर जोरदार निशाणा साधला. त्याचवेळी महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता टाळल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची स्तुतीही केली.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विधान परिषदेवरील निवडीवरून काही काळ मोठा सस्पेन्स निर्माण झाला होता. अखेर निवडणूक आयोगाने विधान परिषद निवडणूक जाहीर केली. ती निवडणूक बिनविरोध झाली. मुख्यमंत्री ठाकरे विधान परिषदेचे सदस्य म्हणजेच आमदार बनल्याने मोठा पेच टळला.
मुख्यमंत्री बनल्यापासून सहा महिन्यांत आमदार बनले नसते तर ठाकरे यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला असता. मात्र, तो पेचप्रसंग त्यांच्या बिनविरोध निवडीने टळला. त्याचा संदर्भ देऊन शिवसेनेने आपले मुखपत्र असणाऱ्या दैनिकातील अग्रलेखातून विरोधकांवर म्हणजे भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. विरोधक ठाकरे सरकार खिळखिळे करण्याचा जेवढा प्रयत्न करतील; तेवढेच ते सरकार मजबूत आणि गतिमान होईल, असा शाब्दिक टोला भाजपला लगावण्यात आला आहे.
विरोधकांनी अनेक अडथळे आणि अडचणी निर्माण केल्या. तरीही ठाकरे विधान परिषदेवर बिनविरोध निवडून गेले. करोनाचे संकट असले तरी आपला राजकीय मतलब साधून घ्यावा, असे मनसुबे काहींनी रचले. महाराष्ट्र करोना संकटाशी झुंज देत असताना विरोधकांच्या डोक्यात राजकारणाचा विषाणू वळवळला. मात्र, मोदी-शहा यांनाच लस टोचून त्या विषाणूचा बंदोबस्त करावा लागला.
राज्यपालांनाही विधान परिषद निवडणूक घेण्याची शिफारस करावी लागली. रखडलेली निवडणूक घेण्याचा मार्ग निवडणूक आयोगाने मोकळा केला. त्यामुळे काहींचे मनसुबे उधळले गेले, अशा शब्दांत अग्रलेखातून भाजपच्या राज्यातील नेतृत्वावर टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत.