मुंबई – महाविकास आघाडीतील घटकपक्ष असणाऱ्या कॉंग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेवर शरसंधान साधले आहे. निरुपम म्हणाले की, मुंबई महापालिकेत शिवसेना सपशेल अपयशी ठरली आहे. मुंबईच्या खराब परिस्थितीला केवळ आणि केवळ शिवसेना जबाबदार आहे.
शिवसेनेचे मुंबई महापालिकेतील अपयश हाच कॉंग्रेसचा मुंबई महापालिकेतील निवडणुकीचा मुद्दा मुख्य मुद्दा असणार आहे, अशा शब्दांमध्ये निरुपम यांनी शिवसेनेवर आरोपाच्या फैरी झाडल्या आहेत. आता यावर शिवसेना काय प्रतिक्रिया देणार, याची उत्सुकता आहे.
निरूपम यांनी यापूर्वी परमबीर सिंह प्रकरणात एक ट्वीट करून खळबळ उडवून दिली होती. ते ट्वीटमध्ये म्हणाले होते की, हे मुंबई पोलिसांचे माजी पोलिस आयुक्त, मंत्र्यावर खंडणी वसुलीचा आरोप लावला होता. स्वत: पाच प्रकरणात वॉन्टेड आहेत. पोलिसांनी म्हटलं आहे की हे फरार आहेत.
माहिती मिळाली आहे की ते बेल्जियमला आहेत. ते बेल्जियमला कसे गेले? यांना कुणी रस्ता मोकळा करुन दिला? आपण अंडरकव्हर अधिकारी पाठवून त्यांना परत आणू शकत नाहीत का? . आता त्यानंतर पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीच्या तोंडावर निरुपम सक्रिय झाल्याचे दिसत आहेत.