लखनौ -उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने आतापर्यंत 166 उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामध्ये 70 टक्के नवे चेहरे आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या माध्यमातून उत्तरप्रदेशात नवा अवतार घेण्यासाठी कॉंग्रेस सक्रिय झाल्याचे दिसते.
अनेक वर्षांपासून उत्तरप्रदेशच्या सत्तेपासून कॉंग्रेस दूर आहे. त्याचा मोठा फटका बसून पक्ष संघटना खिळखिळी झाल्याचे चित्र आहे. अशात यावेळच्या निवडणुकीत कॉंग्रेसची संपूर्ण धुरा पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. निवडणूक निकालाची फारशी चिंता न करता त्यांनी प्रामुख्याने उत्तरप्रदेशात कॉंग्रेसमध्ये नेतृत्वाची नवी फळी उभी करण्याचे प्रयत्न चालवले आहेत.
पक्षाने आतापर्यंत निवडलेल्या उमेदवारांमधून त्याचे प्रत्यंतर येत आहे. उत्तरप्रदेशात विधानसभेच्या एकूण 403 जागा आहेत. त्यातील 166 जागांवरील उमेदवार कॉंग्रेसने निश्चित केले आहेत. त्यापैकी 119 उमेदवार पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरत आहेत.
अधिकाधिक महिलांना राजकारणात आणण्याचा चंग प्रियंका यांनी बांधला आहे. त्यांची ती भूमिका कॉंग्रेसने प्रत्यक्षात उतरवलेली दिसते. पक्षाच्या उमेदवारांमध्ये तब्बल 40 टक्के महिलांचा समावेश आहे. महिलांबरोबरच तरूण, शेतकरी आणि दलितांना उमेदवारीत झुकते माप देण्यात आले आहे. जनतेच्या हक्कांसाठी लढणाऱ्यांना आणि विविध आंदोलनांत सहभागी झालेल्यांना आवर्जून उमेदवारी देण्यात आली आहे.
उत्तरप्रदेशचे राजकारण प्रामुख्याने जाती-धर्मांशी निगडीत मुद्द्यांभोवती फिरताना दिसते. त्याला नवी दिशा देण्याचा प्रयत्न प्रियंका यांच्या पुढाकारातून कॉंग्रेस करत आहे. कॉंग्रेसला नवी रणनीती लाभदायी ठरणार का ते निवडणूक निकालातून पुढे येईल. तूर्त तरी कॉंग्रेसने उत्तरप्रदेशला आपली दखल घेण्यास भाग पाडल्याचे चित्र आहे.