पाच राज्यांतील निवडणुकांच्या निकालानंतर राज्यात महाविकास आघाडी व भाजपमध्ये कलगीतुरा सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयी सभेत केलेल्या वक्तव्यावर शिवसेनेनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘भाजपमधील भ्रष्ट, खाऊबाज आणि घोटाळेबाज लोकांची माहिती उघड करताच व त्याबाबत सरकारला कळवताच तो तपास यंत्रणांवरील दबाव कसा काय ठरू शकतो?,’ असा सवाल शिवसेनेनं केला आहे.
काय आहे सामनाच अग्रलेख
केंद्रीय तपास यंत्रणांवरील दबावाचाच विषय पंतप्रधान मोदी यांनी विजय सभेत काढला म्हणून सांगायचे. महाराष्ट्रातील भाजप पुढारी ऊठसूट केंद्रीय तपास यंत्रणांच्या नावाने धमक्या देतात व त्या धमकीबरहुकूम लगेच कारवाया होतात. महाराष्ट्राला मोडायचे, वाकवायचे, त्यास गुडघ्यावर आणायचे यासाठी सुरू असलेली ही धडपड आहे. चार राज्यांतील विजयाने ही वृत्ती वाढणारच असेल तर महाराष्ट्राला अन्यायाविरोधात लढावेच लागेल. कधीकाळी काँग्रेस पक्षही विजयामागून विजय मिळवत होता. गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त काँग्रेसचाच बोलबाला होता. काँग्रेसने दगड उभा केला तरी तो जिंकत होता.
आज त्यांचे काय झाले? हा राजकारणातला धडा आहे. चार राज्यांतील विजयाच्या आनंदाने भाजप व त्यांचे पुढारी गदगदून गेले आहेत. विशेषतः उत्तर प्रदेशात मोदी आणि योगी या डबल इंजिनाने मोठा विजय मिळवला. आणखी काही दिवस विजयाचा उत्सव व लाडूवाटप सुरू राहील. त्यात काहीच चुकीचे नाही. चार राज्यांतील विजयाने भाजपने इतिहास रचल्याचे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले. भारतीय जनता पक्षासाठी हा विजय महत्त्वाचा आहे. कारण आता ते युक्रेन युद्धाच्या नावाखाली पेट्रोल – डिझेलचे भाव वाढवायला मोकळे झाले व भाव वाढविण्याचा कौल चार राज्यांतील जनतेने दिल्याचे सांगायलाही ते मागे राहणार नाहीत.
पंतप्रधानांच्या नावानेच चारही राज्यांत मते मागण्यात आली व तशी ती पंजाबातही मागण्यात आली. पंजाबातील मतदारांनी भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा का नाकारले? ते भाजप नेतृत्वाकडून समजून घ्यायला आवडले असते. मायावती यांच्या ‘बसपा’ने निवडणुकीतून पळ काढला व त्यांची मते भारतीय जनता पक्षाकडे वळविण्यात आली. त्याचाही फायदाच झाला. मायावती या उत्तर प्रदेशच्या राजकारणात कधीकाळी वाघिणीसारख्या वावरत होत्या, पण उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणून मायावतींना निवडणुकीपासून लांब राहण्यास भाग पाडले गेले.
बसपाचा निवडणुकीतला वावर हा एक उपचार होता. जो पक्ष कधीकाळी उत्तर प्रदेशात स्वबळावर सत्तेवर येण्याचा चमत्कार करू शकला होता, त्या पक्षास 403 आकडय़ाच्या विधानसभेत फक्त एक जागा मिळावी हे कुणाला पटेल काय? केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव हासुद्धा उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजप विजयाचा एक शिल्पकार ठरावा, पण विजय सभेत आपले पंतप्रधान मोदी म्हणतात, विरोधक केंद्रीय तपास यंत्रणांवर दबाव आणत आहेत. पंतप्रधानांच्या या मताशी त्यांचे लोकही सहमत होणार नाहीत. दबाव काय व कसा असतो याचे मायावती हे आहे. तिकडे पंजाबात नवे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी प्रत्येक सरकारी कार्यालयात डॉ. आंबेडकरांची तसबीर लावणे सक्तीचे केले. त्याच वेळी उत्तर प्रदेशात कांशीराम व डॉ. आंबेडकरांच्या विचारांची, प्रतिष्ठेची माती मायावतींकडूनच व्हावी याची खंत आहे. भारतीय जनता पक्षाच्या यशात केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून मायावतींचा ‘रोल’ मोठा आहे. अर्थात मायावतींनी या वेळी स्वतःबरोबर त्यांच्या ‘बसपा’चे अस्तित्व संपवून टाकले.
उत्तर प्रदेशातील विजयाने भारतीय जनता पक्षाने जल्लोष केला. नक्कीच त्यांची सत्ता आली, पण या वेळी अखिलेश यादवांच्या जागा विधानसभेत तिपटीने वाढल्या आहेत. पंजाबातील स्थिती व या तिपटीने वाढलेल्या जागा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपसाठी त्रासदायक ठरतील असे दिसते. बहुमताच्या मॅजिक फिगरपेक्षा भाजपला 60 जागा जास्त मिळाल्या व त्यासाठी संपूर्ण केंद्रीय सत्ता पणास लावण्यात आली. अर्थात शेवटी विजय हा विजयच असतो. मग तो कसा आणि कोणत्याही मार्गाने का मिळेना, पण उत्तर प्रदेशात विजय मिळताच महाराष्ट्रातील भाजप पुढारी इतके बेहोश झाले की, ते ‘‘उत्तर प्रदेश झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’’सारख्या गर्जना करू लागले. पणजीत सचोटीसाठी लढणाऱ्या मनोहर पर्रीकरांचा मुलगा पराभूत झाला याचे दुःख त्यांना नाही, पण एका भयंकर चारित्र्याच्या माणसाने उत्पल पर्रीकरांचा पराभव केला हा उत्सव साजरा होत आहे. पंतप्रधान पारदर्शक व स्वच्छ राजकारणावर बोलतात म्हणून हे सांगितले. आता महत्त्वाचा प्रश्न असा की, केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा फक्त राजकीय विरोधकांच्याच मागे का लागतो? भारतीय जनता पक्षातील भ्रष्ट,
खाऊबाज आणि घोटाळेबाज
लोकांची माहिती उघड करताच व त्याबाबत सरकारला कळवताच तो तपास यंत्रणांवरील दबाव कसा काय ठरू शकतो? महाराष्ट्र आणि प. बंगालने दिल्लीची गुलामी झुगारली, तुमच्या ताटाखालची मांजरे म्हणून जगण्यास नकार दिला म्हणून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करायचा. ही कसली निष्पक्षता आणि स्वतंत्र बाणा? काँग्रेस काळात तपास यंत्रणा दबावाखाली, राजकीय हेतूने कारवाया करतात, असा आरोप करणाऱ्यांत आजचे पंतप्रधान श्री. मोदी आघाडीवर होते, पण आता त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात त्यापेक्षा वेगळे काय घडत आहे? पुन्हा भाजपसंबंधित लोक न्यायालयात पोहोचले की, त्या निवडक मंडळींनाच कारवाई किंवा अटकेपासून दिलासे कसे काय मिळतात?
हे सुद्धा केंद्रीय तपास यंत्रणा आणि न्यायालयांच्या बाबतीतले एक गौडबंगाल आहे. न्याय सगळ्यांना समान हवा. केंद्रीय तपास यंत्रणांवरील दबावाचाच विषय पंतप्रधान मोदी यांनी विजय सभेत काढला म्हणून सांगायचे. महाराष्ट्रातील भाजप पुढारी ऊठसूट केंद्रीय तपास यंत्रणांच्या नावाने धमक्या देतात व त्या धमकीबरहुकूम लगेच कारवाया होतात. हे यंत्रणा स्वतंत्र किंवा निष्पक्ष वगैरे असल्याचे लक्षण नाही. महाराष्ट्राला मोडायचे, वाकवायचे, मराठी स्वाभिमान नष्ट करून त्यास गुडघ्यावर आणायचे यासाठी सुरू असलेली ही धडपड आहे. चार राज्यांतील विजयाने ही वृत्ती वाढणारच असेल तर महाराष्ट्राला अन्यायाविरोधात लढावेच लागेल. विजय विनम्रतेने स्वीकारला तरच तो गौरवशाली ठरतो. कधीकाळी काँग्रेस पक्षही विजयामागून विजय मिळवत होता. गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त काँग्रेसचाच बोलबाला होता. काँग्रेसने दगड उभा केला तरी तो जिंकत होता. आज त्यांचे काय झाले? हा राजकारणातला धडा आहे.