मुंबई : राज्यात सत्तास्थापनेवरून भाजपा शिवसेनेतील तणाव टोकाला पोहोचला असताना अवकाळी पावसासंदर्भात आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या पालकमंत्र्यांच्या बैठकीला शिवसेनेचे मंत्री उपस्थित राहीले.
राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. सुमारे 70 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिके पूर्णत: उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे बळीराजाला तातडीने मदत देण्याची मागणी राज्यात जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर काल नागपुरात सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेऊन परतलेल्या मुख्यमंत्र्यांनी पालक मंत्र्याची तातडीने बैठक बोलावली. या बैठकीत केंद्राच्या मदतीची वाट न पाहता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्राच्या मदतीची वाट न पाहता आकस्मिक निधीद्वारे राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पालकमंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यांमध्ये जाऊन नुकसानीचा अंदाज घेण्याचे आदेश दिले.
राज्यातील सर्व 35 जिल्ह्यांतील 70 लाख हेक्टरवर अवकाळी पावसाने नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पीक विम्याचे पैसे मिळताना शेतकऱ्यांना अडचणी होऊ नये यासाठी या बैठकीत चर्चा झाली. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता आकस्मित निधीने मदत करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आल्याचे यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. दरम्यान, राज्यातील शेतकऱ्याला तातडीने मदत देण्याची गरज दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली.