मुंबई: निवडणूक प्रचारात अमित शहा यांचे सांगणे होते की , ‘ पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले ?’ याचे उत्तर पवारांनी नंतर योग्य शब्दात दिले. जर पवारांनी काय केले ही शंका अमित शहा वगैरेंना असेल , तर मग कोणत्या अनुभवाचा फायदा श्री . मोदी यांना अपेक्षित होता ? पवारांचा अनुभव आहेच , पण तो देशासाठी कामी यावा यासाठी मोदी – शहा यांना साडेपाच वर्षे का लागावीत ? असे प्रश्न शिवसेनेने उपस्थित केले आहेत. शिवसेनेचे मुखपत्र सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर टीका केली.
महाराष्ट्रात शिवरायांच्या विचारांचे राज्य येऊ नये हे मोदी-शहांचे ध्येय होते . शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ द्यायचा नाही हा त्यांचा ‘ कावा ‘ होता . पवारांच्या अनुभवाचा मोरंबा महाराष्ट्र चाखतोच आहे . या वेळी दिल्लीश्वरांना तो चाखता आला नाही . अजित पवारांचा पापडही त्यांना भाजता आला नाही . शेठ , काय हे ! हा महाराष्ट्र आहे . पुन्हा पाय घसरला तर मोडून पडाल, असा टोला देखील शिवसेनेने लगावला.
अग्रलेखात म्हटले आहे कि, शिवसेनेने स्वाभिमान दाखवला. श्री. पवार यांनी दबाव झुगारला. राहुल बजाज यांनी ‘भय’ व ‘झुंडी’चे शास्त्र सांगितले. ही हिमतीची कामे आपल्या महाराष्ट्रातच झाली. कारण हिमतीने जगण्याचा अनुभव जितका महाराष्ट्राला आहे तितका तो अन्य राज्यांना नसावा. मर्जीतले उद्योगपती आणि दलालांसाठी महाराष्ट्राला चरकात टाकून पिळण्याचे काम सुरू होते व हे चरकातले पिळणे पाहून दिल्लीवाले खूश होत असावेत.