औरंगाबाद: राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्र लढले. मात्र निकालानंतर निर्माण झालेल्या सत्तासंघर्षामुळे त्यांच्यात काडीमोड झाला. भाजप सोबत काडीमोड झाल्यानंतर शिवसेनेनं आघाडीशी हातमिळवणी करून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु केल्या असून, त्या अंतिम टप्प्यात असल्याचेही बोलले जात आहे. मात्र शिवसेनेची हि भूमिका अनेकांना पटली नसल्याची परिस्थिती आहे.
महायुतीच्या नावावर मतं मागितली आणि आघाडीसोबत हातमिळवणी केली, म्हणजे हि मतदाराची फसवणूक असल्याचे सांगत औरंगाबाद मधील रत्नाकर भीमराव चौरे यांनी शिवसेनेच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. औरंगाबाद शहरतील बेगमपुरा पोलीस स्टेशन मध्ये हि तक्रार दाखल करण्यात अली आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, नवनिर्वाचित आमदार प्रदीप जैस्वाल, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आमची फसवणूक करून मतदान मागितले आहे. तसेच शिवसेनेने भाजपशी युती तोडल्याने आमचे मतदान व्यर्थ गेले असल्याचे चौरे यांनी या तक्रारीत म्हटले आहे.