वडगाव मावळ – शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकांची नोंद हमी पत्रासह स्वतः करता यावी, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य महसूल विभागाने सुरू केलेल्या ई-पीक पाहणी ऍप (व्हर्जन 2) वर आता शेतकऱ्याचे रजिस्ट्रेशन करून तत्काळ माहिती भरणे सोपे झाले आहे.
राज्यात 1 ऑगस्टपासून खरीप हंगामासाठी ई-पीक पाहणी कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झाली आहे. या संदर्भात जमाबंदी आयुक्त, पुणे येथे झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी स्वतः शेतामध्ये जाऊन ई-पीक पाहणी प्रात्यक्षिक करून दाखविण्याबाबत सूचना केल्या आहेत.
शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळील जुने ई-पीक पाहणी ऍप डिलीट करून नवीन ई-पीक पाहणी (व्हर्जन 2) हे ऍप डाऊनलोड करून खरीप हंगामाची माहिती भरणे आवश्यक आहे. जुन्य ऍपवरील माहिती ग्राह्य धरली जाणार नाही. ई-पीक पाहणी ऍपमध्ये पिकाची माहिती नोंदविल्यानंतर त्यात काही चूक असल्यास 48 तासांमध्ये दुरुस्ती करता येईल. त्यासाठी ऍपच्या वरील उजव्या कोपऱ्यात “पिकांची माहिती पहा” या आयकॉनवर क्लिक करून माहिती दुरुस्ती अथवा नष्ट करण्याची सुविधा आहे. एकदा बदल केल्यानंतर पुन्हा बदल करता येणार नाही.
अशी करा मिश्र पिकांची नोंदणी
शेतातील मिश्र पिकांची नोंद करण्यासाठी आधी कायम पड/ चालू पड क्षेत्राची माहिती नोंदविणे आवश्यक असेल. ऍपच्या होम पेजवरील “पिकाची माहिती नोंदवा. या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर पिकाच्या हंगामाची निवड करून पिकाचा प्रवर्ग यामध्ये मिश्र पिकांची निवड करावी. स्क्रीनवर नवीन उघडलेल्या पेजमध्ये मुख्य पीक व जमीन क्षेत्र तसेच दुय्यम पीक एक, दुय्यम पीक दोन, दुय्यम पीक तीन व क्षेत्र अशा मिश्र पिकांची माहिती जतन करून जल सिंचन साधन व सिंचन पद्धत याची निवड करावी. त्यानंतर “अक्षांश व रेखांश मिळवा या आयकॉन वर क्लिक करून आपल्या शेताचा जीपीएस सुरू करून फोटो अपलोड करावा व माहिती सबमिट करावी.
शेतकऱ्यांना मदतीचे बटण
या नवीन ऍपमध्ये होम पेजवरील डाव्या कोपऱ्यातील आयकॉनवर क्लिक केल्यानंतर मदत या पर्यायाची निवड केल्यास शेतकऱ्यांना युट्यूबच्या माध्यमातून विविध माहिती पूरक व्हिडिओ पाहता येतील. ज्याद्वारे ऍपमध्ये पीक व क्षेत्रात संबंधित माहिती प्रविष्ट करणे सोपे होईल.
ई-पीक पाहणी ऍपसंदर्भात व्यापक जनजागृती सुरू आहे. स्थानिक तलाठी, ग्रामसेवक तसेच कृषी सहायक आदींच्या माध्यमातून मोबाइल ऍपची ओळख व माहिती शेतकऱ्यांना करून दिली जात आहे. महाराजस्व अभियानांतर्गत या संदर्भात कार्यशाळा घेतली जाणार आहे.
– मधुसूदन बर्गे, तहसीलदार, मावळ.