रेडा – सातारा व सांगली जिल्ह्यातील मेंढपाळ पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चारा उपलब्ध असल्यामुळे मेंढपाळ आपले कळप घेऊन मागील महिन्यात दाखल झाले आहेत.
मात्र संचारबंदीचा काळ असल्यामुळे या मेंढपाळ संचारबंदी लागू होताना ज्या तालुक्यात होते, त्याच ठिकाणी स्थानबद्ध झाले आहेत. जिथे आहे तिथला चारा संपुष्टात आला असल्यामुळे सध्या या ठिकाणी चारा उपलब्ध नाही. तसेच येथून तालुका सोडता येत नाही त्यामुळे लॉकडाऊनचा मोठा फटका या मेंढपाळांना बसलेला दिसत आहे.
करोना या विषाणूचा फटका सर्व स्तरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. घरात बंदिस्त बसणाऱ्या नागरिकांना जेवढा या लॉकडाऊनचा त्रास सोसावा लागत आहे, त्याहून अधिक घराबाहेर राहणाऱ्या लोकांना हाकालावधी मोठा कठीण चालला आहे.
असे असले तरी वाढती उष्णता इंदापूर, बारामती, दौंड तालुक्यात असल्यामुळे ग्रामीण भागात अकराच्या पुढे लाहीलाही होताना दिसत आहे. मात्र या उन्हाचा तडाखा सोसत मेंढपाळ आपल्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवण्यासाठी जिवाचे रान करताना दिसत आहेत.
लॉकडाऊनमुळे जिल्हा, तालुका व गावबंदी करण्यात आल्यामुळे या मेंढपाळांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणे मुश्किल झाले आहे. या मेंढपाळांना मोकळ्या असणाऱ्या शेत जमिनीत परंपरेनुसार शेतकरी थांबवून घेतात, मात्र हे मेंढपाळ कुठून आलेत, नको टेन्शन म्हणून अनेक गावाकडील शेतकरी नको आमच्या वस्तीवर, नको आमच्या शेतात म्हणून मेंढपाळांना थांबल्यावर देखील मोठ्या मर्यादा आलेल्या दिसतात.
ग्रामीण भागामध्ये ते गायी व इतर जनावरे सांभाळत असताना त्या जनावरांना विकत घेऊन देखील चारा संपला असताना पुरवला जातो. मात्र या कळपाला, चारा कुठून घालणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. चारा, पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी, ज्या तालुक्याच्या हद्दीत हे मेंढपाळ आहेत, त्यांना दुसऱ्या तालुक्यात जाता येत नाही. त्यामुळे परजिल्ह्यातील मेंढपाळ चाऱ्यासाठी वणवण भटकताना दिसत आहेत.
चारा उपलब्ध करून द्यावा
करोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, संचारबंदीचे तंतोतंत पालन प्रत्येक तालुक्याच्या हद्दीत केले जात आहे. त्यामुळे भटकंती करणारा मेंढपाळ या संचारबंदीच्या काळात पुरता अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शासनाने या अडकलेल्या मेंढपाळांचा सर्व्हे करून तात्काळ चारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मेंढपाळ वर्गातून करण्यात येत आहे.
बाहेरून येणाऱ्यांची कदर कोण करणार?
करोना या आजाराची धास्ती गावाकडच्या नागरिकांनी घेतली आहे. खबरदारी पाळण्यासाठी बाहेरून दारासमोर भंगारवाला, इतर विक्रेता, अथवा हातावरचे पोट असलेला मागतकरी तसेच मेंढपाळ अशा गरीब कुटुंबाची कोणीही कदर करताना दिसत नाही. त्यामुळे पर जिल्ह्यातून मेंढ्या चारण्यासाठी येणाऱ्याअशा लोकांना आधार देण्याची भूमिका शासनाच्या माध्यमातून व्हावी अशी अपेक्षा नागरिकांना व्यक्त होत आहे.