राजगुरूनगर – केंद्रीय मंत्री नारायण राणे व माजी मंत्री रामदास कदम यांनी मराठा समाजाबाबत केलेल्या बेताल वक्तव्याचा राजगुरूनगर येथे 23 दिवसांपासून सुरू असलेल्या बेमुदत साखळी उपोषणकर्त्यांकडून जोरदार निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलनातील काही तरुणांनी मुंडण करीत निषेध व्यक्त केला.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दोन दिवसांपूर्वी कोकणातील मराठा समाज कुणबी जातीचे दाखले घेणार नाही, असे म्हटले होते. यावर रामदास कदम यांनीही आपली तीच भूमिका असल्याचे सांगितले. मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांचा अभ्यास चांगला आहे; पण थोडा कच्चा आहे. विदर्भ, मराठवाडा येथील मराठे कुणबी प्रमाणपत्र घेतील. पण, कोकणात कुणबी मराठा रोटी बेटी व्यवहार होत नाही. जरांगे यांना हे माहित नाही. त्यामुळे कोकणातील मराठे असे कुणबी प्रमाणपत्र घेणार नाहीत असे कदम म्हणाले. सरकारला अडचणीत आणण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत.
जरांगे यांच्या उपोषणामागे काही राजकीय शक्तींचा हात आहे असा आरोपही रामदास कदम यांनी केला होता नारायण राणे, रामदास कदम यांच्या बेताल वक्तव्याचा राजगुरूनगर येथे रविवारी (दि. 22) तीव्र निषेध करण्यात आला. राजगुरूनगरात शुक्रवारी (दि. 20) मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा झाली. दरम्यान नारायण राणे व रामदास कदम यांनी मराठा समाजाबाबत बेताल वक्तव्य करीत मराठा समाजाचा अवमान केला. मराठा आरक्षणासाठी राज्यभर लाखोंचे मोर्चे, विराट सभा होत असताना मराठा समाजाचे नेते असे बेताल व्यक्तव्य करीत असल्याने त्यांचा तीव्र निषेध केला जात आहे. याप्रसंगी मराठा क्रांती मोर्चाचे सदस्य उपस्थित होते.
त्यांची दशक्रिया म्हणून…
आंदोलक संतोष टाकळकर, कुशल जाधव म्हणाले की, नारायण राणे, रामदास कदम हे मराठा समाजाबाबत बेताल व्यक्तव्य करीत आहेत. त्यांचा आम्ही तीव्र निषेध करतो. समाजासाठी ते राहिले नाहीत, ते मेले आहेत. त्यांची दशक्रिया म्हणून आम्ही मुंडण केले, असल्याचे त्यांनी नमूद केले.
कंपन्यांमध्ये बुधवारी बंद पुकारण्याचे पत्र
जरांगे पाटील यांनी सरकारला दि. 24 तारखेचा अल्टिमेट दिला आहे. तर तालुक्यातील चाकण एमआयडीसी, सेझ (विशेष आर्थिक क्षेत्र), पीएमआयडीसी(पश्चिम महाराष्ट्र औद्योगिक वसाहत), आळंदी परिसरातील कंपन्यासह तालुक्यातील सर्व कंपन्यांमध्ये बुधवारी (दि. 25) बंद पुकरण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. त्यांचा या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळेल, असे खेड तालुका मराठा मोर्चाचे समन्वयक अंकुश राक्षे यांनी सांगितले