नवी दिल्ली – वायएसआर तेलंगण पार्टीच्या अध्यक्षा वायएस शर्मिला यांनी अलीकडेच केलेल्या पदयात्रेमुळे त्यांनी देशपातळीवर एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.
शर्मिला यांनी संपूर्ण तेलंगणा राज्यभर पदयात्रा केली होती. राज्यभरातील नागरिकांशी आणि वायएसआर तेलंगण पार्टीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी त्यांनी 3,800 किलोमीटरचा पायी प्रवास केला. एवढ्या अंतराचा पायी प्रवास करणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. त्यांच्या विक्रमाची नोंद “इंडियन बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये करण्यात आली असून शर्मिला यांना 15 ऑगस्ट रोजी या विक्रमाचे प्रमाणपत्र देखील देण्यात आले आहे.
शर्मिला यांनी पूर्वीचे ट्विटर असलेल्या “एक्स’ या सोशल नेटवर्कवरच्या पोस्टमध्ये या विकमाची माहिती दिली आहे. “तेलंगणातील लोकांप्रती माझी बांधिलकी आणि त्यांच्या आकांक्षांना इंडियन बुक ऑफ रेकॉर्डसकडून मान्यता आणि प्रशंसा मिळाली आहे. माझी पदयात्रा कोणताही विक्रम प्रस्थापित करण्यासाठी नव्हती. तरी मी हे प्रमाणपत्र स्वीकारले आहे.’ असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
शर्मिला या आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वाय एस राजशेखर रेड्डी यांच्या कन्या आणि आंध्र प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्या भगिनी आहेत. 20 ऑक्टोबर 2021 रोजी चेवेल्ला येथून त्यांनी पदयात्रा काढली आणि या वर्षी फेब्रुवारीपर्यंत तेलंगणातील अनेक विधानसभा मतदारसंघांतून 3,800 किलोमीटरचा प्रवास त्यांनी केला.