पुणे – पुण्यातील एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल केलेल्या विधानावरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. शरजील यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात राजकीय नेत्यांनी तक्रारी दाखल करण्यास सुरुवात केली आहे. भाजप या मुद्दावर आक्रमक असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडेच तक्रार केली आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. यावर आता माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एल्गार परिषदेत भाषण देणाऱ्या शरजील उस्मानीला हिंदू नव्हे तर मनुवादी म्हणायचं होतं, असं बी.जी. कोळसे पाटील यांनी नमूद केले. तर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो, असं कोळसे-पाटील यांनी म्हटले आहे.
यावेळी कोळसे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली. राजधानी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणारे देखील हिंदूच असल्याची आठवण कोळसे पाटील यांनी फडणवीसांना करून दिली. आमच्यावर गुन्हे दाखल करायचे असतील तर खुशाल करा, असं आवाहनही त्यांनी केले. तसेच देवेंद्र फडणवीस यांना हिंदुंचा एवढाच कळवळा आहे, तर मग उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री न होऊ देण्यासाठी का प्रयत्न केले, असा सवालही कोळसे-पाटील यांनी उपस्थित केला आहे.
एल्गार परिषदेचे पुण्यात शनिवारी ३० जानेवारी रोजी आयोजन केले होते. त्यात अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे शरजिल उस्मानी यांचे भाषण झाले होते. त्यात त्याने हिंदुविषयी आपत्तीजनक व भडकावू विधाने केल्याने पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.