लंडन -भारताच्या पहिल्या डावात शार्दूल ठाकूरने अर्धशतकी खेळी करत एक मोठा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. ओव्हल मैदानावर सलग तिसऱ्या डावात शार्दूलने 50 हून अधिक धावा केल्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ओव्हल मैदानावर अशी कामगिरी करणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. याआधी ऑस्ट्रेलियाचे सर डॉन ब्रॅडमन आणि ऍलन बॉर्डर यांनी अशी कामगिरी केली होती.
शार्दूल ठाकूरने याआधी जेव्हा भारतीय संघ 2021 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेला होता तेव्हा कसोटी मालिकेतील चौथा सामना ओव्हलवर खेळला होता. शार्दूलने या सामन्यात पहिल्या डावात 36 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 57 धावा ठोकल्या होत्या. तर दुसऱ्या डावात त्याने 72 चेंडूत 60 धावा केल्या होत्या.
दरम्यान, भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरने ओव्हलची खेळपट्टी 2021 मध्ये खेळल्या गेलेल्या पृष्ठभागापेक्षा खूप वेगळी असल्याचे सांगत ओव्हलची खेळपट्टी अंडर प्रिपेअर्ड असल्याचे म्हटले आहे. ठाकूरने महत्त्वपूर्ण 51 धावा केल्या आणि अजिंक्य रहाणेसमवेत 109 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत भारताला 296 पर्यंत नेले.
“खेळपट्टी नक्कीच वेगळी आहे. मागच्या वेळी आम्ही खेळलो होतो तेव्हा खेळपट्टी काहीतरी वेगळीच होती आणि इंग्लंडमध्ये ढगांचे आच्छादन असल्यास चेंडू स्विंग होतो, हे सर्वांना माहीत आहे.