मुंबई – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना 2024 ची निवडणूक तुम्ही एकत्र लढणार का असा सवाल विचारण्यात आला होता. यावर ‘आज आघाडी आहे. एकत्र काम करायची इच्छा आहे पण इच्छाच केवळ पुरेशी नसते,’ असे उत्तर शरद पवारांनी दिले. त्यांच्या या उत्तराने सध्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, “अनेकदा शरद पवार यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ तुम्ही काढत असता, हे मी स्वतः पाहिलं आहे. महाविकास आघाडी या क्षणी अत्यंत मजबूत आहे. महाविकास आघाडीची 1 मे रोजी मुंबईत ऐतिहासिक रॅली, सभा होत आहे. त्या सभेला तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित राहतील. महाविकास आघाडीच्या या उभारणीमध्ये शरद पवार यांचा महत्त्वाचा वाटा आहे. आम्ही सगळे आहोत, उद्धव ठाकरे, राहुल गांधी असतील. पण, शरद पवार यांचं महत्त्व या आघाडीत आहे आणि ते राहणार. ”
“शरद पवार यांची पहिल्यापासून इच्छा आहे, तिघे एकत्र राहिलो तर 2024साली आपण भारतीय जनता पक्षाचा पराभव करू आणि लोकसभासुद्धा मोठ्या संख्येने जिंकू ही शरद पवार यांची भूमिका आहे. आम्ही सतत त्यांच्याशी बोलत असतो. आत्ताच थोड्या वेळापूर्वी मी त्यांच्याशी बोललोआणि मला अजिबात वाटत नाही की महाविकास आघाडी तुटावी अशी त्यांची भूमिका असेल, “असं संजय राऊत यांनी स्पष्ट सांगितले.
काय म्हणाले होते शरद पवार ?
2024 च्या निवडणूक काँग्रेस,राष्ट्रवादी आणि सेना सोबत लढणार का ? तसेच सोबत वंचित आघाडी असणार का ? असा सवाल शरद [पवार यांना विचारण्यात आला होता. ”वंचित आघाडीशी आमची चर्चा झालेली नाही. वंचितसोबत झालेली चर्चा ही कर्नाटकातील काही जागांपुरतीच मर्यादित होती. बाकी आम्ही एकत्र लढणार वेगैरे.. आज आघाडी आहे. एकत्र काम करायची इच्छा आहे पण इच्छाच केवळ पुरेशी नसते. जागांचा वाटप.. त्यात काही इश्यू आहेत कि नाही.. हे अजून केलेलं नाही.. तर कसं सांगता येईल” असं स्पष्ट मत यावेळी पवारांनी व्यक्त केलं.
भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावरही पवार यांनी भाष्य केलं आहे. “कोणी फोडायचं काम करत असेल तर ती त्यांची स्टेटर्जी आहे. आम्हाला त्याबाबत भक्कपणाने भूमिका घ्यावी लागले. त्याबाबत आज सांगणं योग्य नाही. आम्ही याबाबत कोणाशी चर्चाच केलेली नाही.”