मुंबई – नवाब मलिक यांच्यावर जी कारवाई होत आहे, यात काही नवीन नाही. सध्या ज्या पद्धतीने यंत्रणेचा गैरवापर केला जातोय, त्याचे हे उदाहरण आहे. आज ना उद्या कधीतरी हे घडेल याची आम्हाला खात्री होती. नवाब मलिक हे जाहीरपणे बाहेर बोलतात, त्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई होईल, याची खात्री होती. त्यामुळे यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.
नवाब मलिक यांच्यावर कोणती केस काढली याची माहिती नाही. कुणी मुस्लिम कार्यकर्ता असला तर दाऊदचे नाव घ्यायचे आणि आरोप करायचे, यात काही नवीन नाही. पण खरे काय हे कुणालाही माहिती नाही, असे शरद पवार म्हणाले.
मी राज्याचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा माझ्यावर देखील असाच आरोप झाला होता. त्यानिमित्ताने राज्यात एक वातावरण निर्माण झालं होतं. आज त्या गोष्टीला 25 वर्ष झाली. पण आजही तशीच नावे घेऊन लोकांना बदनाम करण्याचे, त्रास देण्याचे, सत्तेचा गैरवापर करण्याचे काम सुरु आहे. जे लोक केंद्र सरकारच्या विरोधात किंवा यंत्रणेच्या विरोधात स्वच्छ भूमिका मांडत आहेत, त्यांना त्रास देण्याचा प्रकार याठिकाणी घडत असल्याचे दिसत आहे, असेही शरद पवार म्हणाले.