नवी दिल्ली – “पप्पा सांगा कुणाचे? पप्पा माझ्या मम्मीचे…मम्मी सांगा कुणाची…मम्मी माझ्या पप्पांची…’ 1970 मध्ये जयश्री गडकर आणि अरूण सरनाईक यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘घरकुल’ या चित्रपटातील हे गाणं. याच गाण्याने ‘इंडिया’तील 26 पक्षांतील मातब्बर नेत्यांची झोप उडविली आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पक्षातील घडामोडींमुळे या गाण्याची आठवण होते. “इंडिया’ या विरोधी पक्षांच्या आघाडीतील नेत्यांच्या मनात सध्या एकाच प्रश्नाने भुंगा घातलेला आहे. तो म्हणजे, पवार सांगा कुणाचे? इंडियाचे? की आणखी कुणाचे?
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. संसदेच्या आवारात येणा-या जाणा-यांच्या मुखातून एकच प्रश्न ऐकायला मिळतो आणि तो म्हणजे शरद पवार नेमके कुणासोबत आहेत? विरोधी पक्षांच्या नेत्यांनी काल बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेवून मणिपूर हिंसाचाराच्या प्रकरणात लक्षात घालण्याची विनंती केली. यात, कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार, लोकसभेतील कॉंग्रेसचे नेते अधिर रंजन चौधरी यांच्यासह इंडियातील घटक पक्षांचे नेते होते. शिवाय, मणिपूरचा दौरा करून आलेले खासदार सुध्दा होते.
राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सर्व नेते उपस्थित होते. यास अपवाद होता तो राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांचा. पवार यांच्या या अनुपस्थितीमुळे विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाला आपण जावू नये असा आग्रह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी धरला होता. परंतु, कुणाच्याही विरोधाला न जुमानता पवार यांनी पुरस्कार समारंभाला हजेरी लावली. महत्वाचा मुद्या असा की, पवार केवळ हजर राहिलेत असे नव्हे तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खांद्यावर दोनवेळा थाप सुध्दा मारली. पवार यांनी ज्या पध्दतीने ही थाप मारली ती थेट विरोधी पक्षांच्या हृदयावर आदळली आहे.
आतापर्यंत “इंडिया’ च्या दोन बैठका झाल्या आहेत. पहिली बैठक पाटण्यात आणि दुसरी बैठक कर्नाटकच्या बंगलोरमध्ये झाली. दोन्ही ठिकाणी पवार हजर होते. विरोधकांची वज्रमूठ बांधण्यासाठी विरोधक जीवाचे रान करीत असतानाच अजितदादा पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सामील झाले. एकीकडे शरद पवार विरोधकांना एकजूट करण्याचा प्रयत्न करीत आहेत तर दुसरीकडे भाजपप्रणित सरकारमध्ये राकॉचे नेते सामील होत आहेत. अशातच, प्रेस कॉन्फरन्समध्ये उपस्थित न राहिल्यामुळे विरोधकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
राष्ट्रवादी ‘इंडिया’सोबतच – दुहान
शरद पवार यांना लोकसभेत बोलायचे होते म्हणून ते राष्ट्रपतींच्या भेटीनंतरच्या पत्रकार परिषदेला उपस्थित नव्हते, अशी माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया दुहान यांनी बोलताना दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष “इंडिया’सोबतच आहे आणि राहणार. फक्त त्या दिवशी प्रश्न असल्यामुळे पवार नव्हते, असे त्या म्हणाल्या.