कोल्हापूर : देशात मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्ष व्हावेत अशी एकूणच चर्चा रंगली आहे. दिल्लीत मंगळवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवारदेखील उपस्थित होते. याच बैठकीत शरद पवारांकडे यूपीएचं अध्यक्षपद सोपवण्याचा ठराव मांडण्यात आला आणि संमतही करण्यात आला. त्यातच आता शरद पवारांनी यावर भाष्य केले आहे.
“देशातील सध्याची राजकीय स्थिती लक्षात घेता शरद पवार यांनी काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांचं राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करायला हवं. शरद पवार हे देशातील सध्याचे सर्वात अनुभवी नेते आहेत. संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री म्हणून त्यांचे देशाच्या विकासातील योगदान मोठे आहे. या सर्व बाबी विचारात घेत त्यांच्याकडे विरोधी पक्षाचे नेतृत्व सोपवायला हवं,” असंही या ठरावात नमूद होतं.
“मी काही नेतृत्व करण्याची जबाबदारी घेणार नाही. मध्यंतरी आमच्या एका तरुणाने युपीएचा अध्यक्ष व्हावा यासाठी ठराव केला. मला त्यात अजिबात रस नाही, मी त्याच्याच पडणार नाही. मी काही जबाबदारी घेणार नाही. पण एकत्र येऊन काही पर्याय देता येत असेल तर त्यांना सहकार्य, शक्ती, पाठिंबा, मदत देण्यासाठी माझी तयारी आहे,” असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं.
“विरोधी पक्षाने एकत्र यावं असं म्हणतात त्यावेळी काही वास्तव गोष्टी दुलर्क्ष करुन चालणार नाहीत.ममता बॅनर्जींचा अत्यंत शक्तिशाली पक्ष आहे, सत्ता असून लोकांचा पाठिंबा आहे. इतर सर्व पक्षांचीही राज्या राज्यांमध्ये शक्तीकेंद्र आहेत. पण काँग्रेस एक असा पक्ष आहे जो देशाच्या प्रत्येक राज्यात कमी जास्त प्रमाणात आहे. आज त्यांची सत्ता नसेल पण काँग्रेस कार्यकर्ता देशाच्या प्रत्येक राज्यातील जिल्ह्यात, गावात पहायला मिळतो. त्यामुळे पर्यायी काही करायचं असेल तर ज्या पक्षाचा वेस व्यापक आहे त्याला घेऊन करणं वास्तव्याला धरुन होईल. तसा विचार वेगवेगळ्या पक्षातील लोक करत असतील तर त्याच्यातून काही निर्णय येण्याची शक्यता आहे,” असंही शरद पवार म्हणाले.
संजय राऊतांनी युपीएचा सातबारा काँग्रेस आणि गांधी घराण्याकडे असून तो बदलण्याची गरज असल्याचं म्हटलं असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता शरद पवार म्हणाले की, “त्यांचं मत हे माझं मत असं नाही”.
वाढत्या इंधनदराविरोधात विरोधक आंदोलन करत नसल्याच्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, “सध्या अधिवेशन सुरु आहे. लोकसभा, राज्यसभेत यावरुन विरोधक आक्रमकणे भूमिका मांडत असून ती मांडली जाईल. प्रत्येक वेळी रस्त्यावर उतरायचं नसतं. लोकसभा, राज्यसभा सुरु असताना त्या व्यासपीठाचा उपयोग केला पाहिजे. तिथे काही नाही झालं तर रस्त्यावर उतरुया”नितीन गडकरी यांनी काँग्रेस मजबूत झाली पाहिजे असं म्हटलं आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले की, “देशात शक्तीशाली विरोधी पक्ष असण्याची गरज आजे. संसदीय लोकशाही मजबूत करायची असते. एकच पक्ष असला की मग ते पुतीनसारखं होईल. रशियाने ठराव केला, चीनने केला. असे पुतीन होऊ नये ही अपेक्षा आहे”.
यावेळी त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरही भाष्य केलं. “राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची व्यवस्था केली आहे. ममता बॅनर्जी यांची इच्छा आहे की, सर्वांनी एकत्र बसून विचार करावां. उद्धव ठाकरे आणि मी बैठक बोलवावी. ती बैठक मुंबईत व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. आम्ही इतरांशी बोललो नाही. ममतादीदींनी चांगल्या सद्भभावनेतून भूमिका मांडली आहे. अशी बैठक घ्यायची असेल तर सर्वांना विश्वासात घ्यावे लागेल. आंध्रप्रदेश, तेलंगना, राजस्थान, तामिळनाडू येथील मुख्यमंत्री आदी सर्वांशी चर्चा करून एकत्र बसून निर्णय घेऊ. राष्ट्रपतीपदाबाबतचं धोरण ठरवू,” असे पवार म्हणाले.