बारामती ( जळोची ) – ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत आज बारामतीत कामगार मेळावा पार पडला. या मेळाव्यात पवारांनी जोरदार फटकेबाजी केली.
पक्ष घड्याळ झेंडा या सगळ्याची चोरी झाली. किरकोळ काही नाही होलसेल चोरी झाली. सगळ्या देशाला माहित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणी स्थापन केला. जे घेऊन गेले त्यांनी मागील निवडणुकीमध्ये कोणाच्या नावाने मते मागितली, तर नेत्यांच्या आणि पक्षाच्या नावाने. ज्याचा पक्ष होता, घड्याळ चिन्ह होते,हे सर्व घेऊन काही मंडळी गेली. त्यामुळे काही लोक नाराज झाले. मी त्यांना सांगितलं नाराज व्हायचं नाही. पक्ष चिन्ह गेले असल तरी आपण नव्याने पक्ष उभा करू. असे विधान करत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली.
पुढे बोलताना पवार म्हणाले की, काही नसताना पक्ष काढला. केवळ पक्ष काढला नाही, तर राज्य सुद्धा हातात घेतले. अनेकांना मंत्री केलं,अनेकांना आमदार केलं, अनेकांना खासदार केलं, केंद्रात मंत्री केलं. नवनवीन धोरणे राबवली. महिलांसाठी धोरण केली. कधीही या देशामध्ये महिलांना प्रॉपर्टी मध्ये अधिकार नव्हता. तो अधिकार त्यांना दिला असे म्हणत, हा जो राज्य चालवण्याचा प्रकार आहे. ते देशाच्या हिताचे नाही. जिथे हित नाही, तिथे बदल व्हायला पाहिजे आणि बदल पाहिजे असेल तर लोकसभेची निवडणूक महत्त्वाची आहे, म्हणत पवारांनी राज्यासह केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.
ज्या देशांमध्ये घटनेने दिलेल्या अधिकारांची पायमल्ली केली जात आहे. त्या देशामध्ये हुकूमशाही दिसून येत. हे आपण भारताच्या आजूबाजूच्या देशामध्ये पाहिले आहे. बांगलादेशमध्ये रेहमान हे अध्यक्ष होते. त्यांची हत्या करण्यात आली. आणि लष्कराने देश हातात घेतला. पाकिस्तान,श्रीलंका मध्येही असेच घडले. लष्कर जेव्हा देश हातात घेते. तेव्हा तुमचे माझे सर्व अधिकार नष्ट होतात. असे व्हायचे नसेल तर घटनेचे रक्षण करणे हे तुमचे माझे कर्तव्य आहे. सुदैवाने डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून आपणाला अधिकार दिला आहे.
या निवडणुकीमध्ये आम्ही अधिक लक्ष घातले आहे. याचे कारण म्हणजे गेली दहा वर्ष पार्लमेंट मध्ये मोदींचे राज्य आहे. आणि मोदींचे या पार्लमेंटवर किती लक्ष आहे हे जर तुम्हाला सांगितलं, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. पार्लमेंटच्या पहिल्या दिवशी मोदींनी पायरीवर साष्टांग नमस्कार केला होता. आणि मी सन्मान करतो असे देशाला दाखवलं.
आताच एक महिन्याचं पार्लमेंटचं सेशन संपलं. या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात कितीदा आले, किती वेळेसाठी आले. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. केवळ एक दिवसासाठी आणि काही वेळेसाठीच आले होते. याचा अर्थ हाच होतो की, ही जी संसदीय लोकशाही आहे. त्याच्यावर त्यांचा किती विश्वास आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे.
माझ्यासारख्याला काळजी ही वाटते की, कर्नाटकातील भाजपाचे खासदार हेगडे आपल्या भाषणात म्हणाले की, हे मत तुम्ही आम्हाला द्या. याचे कारण म्हणजे हे मत तुम्ही आम्हाला दिले आणि सत्ता हातात आली की, मोदींना या देशातील घटना बदलायची आहे. म्हणजे त्यांच्या मनात काय आहे हे त्या निमित्ताने स्पष्ट झाले. या देशाची घटना जो तुमचा अधिकार आहे. तीच हे बदलणार त्यासाठीच हे मत मागणार ही भूमिका दिसते .