पुणे – “बिहार निवडणुकीत एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री नितीशकुमार आणि भाजपचे सर्व नेते प्रचारामध्ये होते, तर दुसऱ्या बाजूला अनुभव नसलेला तरुण नेता निवडणूक लढवत होता. त्यामुळे तेजस्वी यादव यांना जेवढ्या काही जागा मिळताहेत ती त्यांची “अचिव्हमेंट’ म्हणावी लागेल. तेजस्वी यादव यांच्या या यशामुळे तरुणांना प्रेरणा आणि इतरांनाही योग्य ती दिशा मिळेल,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बिहार निवडणूक निकालावर प्रतिक्रिया व्यक्त केली.
पवार हे मंगळवारी पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आले होते. ते म्हणाले, “बिहारमध्ये आता हळूहळू बदल होत असल्याची वाट दिसत आहे. तेजस्वी यादव यांना जेवढा फ्री हॅंड मिळेल तेवढे चांगले होईल. म्हणून बिहारमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे बिहारमध्ये चमत्कार झाला. हा प्रकाश आमच्या डोक्यात पत्रकारांमुळेच पडला आहे, असा टोलाही पवार यांनी लगावला आहे.
जगातील मोठी लोकशाही म्हणून अमेरिकेला ओळखले जाते. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा निकाल काहीही असो, जागा दिली नाही म्हणून नाउमेद होऊन टोकांची भूमिका घेऊ नये. हा लोकांचा अधिकार आहे. निर्णय स्वच्छ लागल्यानंतर काहीही वक्तव्यं करणं हे डोनाल्ड्र ट्रम्प यांच्या वयाला शोभत नाही, असेही पवार यांनी सांगितले.
राज्यपालांनी नाईक कुटुंबाबद्दल चिंता व्यक्त करावी
“महाराष्ट्राच्या राज्यपालांनी अर्णब गोस्वामी यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली. हे चांगले आहे. मात्र ज्यांच्या घरात दोन आत्महत्या झाल्या आहेत. त्यांच्याबद्दल राज्यपालांनी चिंता व्यक्त केली असती, तर चांगले वाटले असते,’ असा टोला पवारांनी यावेळी लगावला. नाईक कुटुंब मला भेटल्याचे जे फोटो व्हायरल होत आहेत, ते सात वर्षांपूर्वीचे आहेत, असाही दावा पवार यांनी केला.