मुंबई : देशात मागील काही आठवड्यांपासून देशात द काश्मीर फाईल्स या चित्रपटावरून रान उठले आहे. काही लोक या चित्रपटाच्या समर्थनार्थ उभे आहेत तर काहींनी याला राजकीय रंग दिला असल्याची जाहीर टीका केली आहे. या मुद्द्यावर राजकीय नेत्यांनी आपापली भूमिका देखील स्पष्ट केली आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपले मत मांडले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी याविषयी भाष्य करत असताना भाजप आणि पंतप्रधानांवर टीका केली आहे.
‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटामुळे देशातील एक विचार मारला जात असून तसेच बंधुप्रेम संपवले जात असल्याचा आरोप शरद पवारांनी यावेळी केला. तसेच “या चित्रपटामुळे एक विचार मारला जात आहे. त्यात गांधीजी, नेहरू यांचा काय संबंध? अशी विचारणाही त्यांनी केली आहे. दिल्लीमध्ये आयोजित राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्याला शरद पवारांनी उपस्थिती लावली. या मेळावल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
पुढे बोलताना पवार म्हणाले,“त्यावेळी जे काही झालं तेव्हा व्ही. पी. सिंग सत्तेत होते. भाजपाचा त्यांना पाठिंबा होता. मुफ्ती मोहम्मद गृहमंत्री, राज्यपाल कोण होते हे सगळ्यांना माहिती आहे. आता त्याचा मुद्दा तयार केला जातो, त्याची जबाबदारी तेच घेऊ शकतात. जे काही झालं ते देशासाठी चांगलं झालं नाही. त्या लोकांना तिथून इकडे यावं लागलं ही चांगली गोष्ट नव्हती. पण जे झालं ते विसरून समाजात एकता कशी राहील हे पाहिलं पाहिजे,” असेदेखील शरद पवारांनी म्हटले.
पंत्रधनांवर निशाणा साधतान, “दु:ख याचं आहे की पंतप्रधान कुठल्याही पक्षाचे असोत त्यांनी देश एक ठेवणं महत्वाचं असतं. मात्र पंतप्रधान म्हणतात चित्रपट चांगला आहे. महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन सुरु होतं तेव्हा एका दुपारी एकही आमदार सदनात नव्हता. ते सगळे चित्रपट पाहायला गेले होते. असंच सुरु राहिलं तर देशात एकता राहणार नाही,” अशी भीती शरद पवारांनी यावेळी व्यक्त केली.
दरम्यान, या चित्रपटाच्या अनुषंगाने भाजपच्या धर्मनिरपेक्षतेविषयी पवार म्हणाले,“ देशातील धर्मनिरपेक्षतेवर भाजपाचा विश्वास नाही. त्यात पाठिंबा भाजपाला मिळाला आणि सत्ता त्यांच्याकडे आली. एक चित्रपट येतो, त्यात काश्मिरी पंडितांवर हल्ले झाले आणि ते हल्ले काँग्रेस आणि अल्पसंख्यांकांनी केले हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. हिंदूंवर अत्याचार झाले हे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असेही शरद पवार म्हणाले.