बारामती – मागील अनेक दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातील वाद सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी मंदिर खुले करण्यासंदर्भात राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे तक्रार केली होती. आता शरद पवार यांनी पुन्हा एकदा राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासात लोकशाही आणि घटनेने असलेली जबाबदारी न पाळणारा राज्यपाल महाराष्ट्राने कधी पाहिला नाही. हा चमत्कार सध्याच्या राज्यपालांनी केला, ही दुर्दैवी गोष्ट असल्याचं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. राज्यपाल नियुक्त सदस्यांबाबत त्यांना प्रश्न विचारला असता पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
घटनेने राज्यसरकारला व मंत्रिमंडळाला जे अधिकार दिले आहेत त्या अधिकारानुसार शिफारशी झालेल्या गोष्टींची अंमलबजावणी करणे ही राज्यपालांची जबाबदारी असते. मोदीसाहेब स्वतः मुख्यमंत्री होते त्यावेळी राज्यपालांकडून त्यांची अशाप्रकारची अडवणूक होती अशी त्यांची तक्रार होती. तसे त्यांनी अनेकदा बोलून दाखवले होते हे माझ्या पाहणीत आहे. दुर्दैवाने त्यांना हे सहन करावं लागलं. तेच आता त्यांच्या राज्यातसुध्दा होतय. महाराष्ट्रासारख्या राज्यात राज्यपाल तेच करतायत. यावर केंद्रसरकार बघ्याची भूमिका घेतेय ही गोष्ट चिंताजनक असल्याचं शरद पवार यांनी सांगितले.