औरंगाबाद – सध्या राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेनेत बंड झाल्यापासून एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्हासाठी रस्सीखेच सुरु होती. त्यातच पुढील काही दिवसांत अंधेरीतील विधानसभेच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर काल निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं धनुष्यबाण चिन्ह तात्पुरतं गोठवलं आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जात असताना राष्ट्रवादीचे शरद पवार ( Sharad Pawar ) आणि भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Ravasaheb Danave ) यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे.
निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयामुळे आता अंधेरी पोटनिवडणुकीत शिंदे गट किंवा ठाकरे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह वापरता येणार नाही. त्यामुळे आता उद्धव ठाकरे या पोटनिवडणुकीत कोणते चिन्ह वापरणार आणि कशाप्रकारे निवडणूक लढवणार याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत असे स्पष्ट सांगितले आहे. मात्र त्यांच्या रावसाहेब दानवे ( Ravasaheb Danave ) यांच्यासोबतच हा प्रवास राजकीय चर्चेचा विषय बनला आहे.
शरद पवार ( Sharad Pawar ) आणि रावसाहेब दानवे ( Ravasaheb Danave ) यांच्या एकत्र प्रवासामागचे नेमके कारण समोर आले आहे. बीड येथे माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या ८५व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यासाठी शरद पवार हे औरंगाबाद येथे दाखल झाले. औरंगाबाद येथील ज्या हॉटेलमध्ये शरद पवार ( Sharad Pawar ) थांबले होते तेथे भाजपचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पोहोचले. यानंतर दोन्ही नेत्यांनी औरंगाबाद ते बीड असा एकाच गाडीतून प्रवास केला.
काल निवडणूक आयोगाच्या धनुष्यबाण गोठवण्याच्या निर्णयांनंतर शरद पवारांनी ( Sharad Pawar ) याबाबत भाष्य केले. “आता शिवसेनेने निवडणुकांना सामोरे जायची तयारी अगोदर केली पाहिजे. याअगोदर मी स्वतं: वेगवेगळ्या चिन्हावर लढलो आहे, त्याचा काही तोटा होत नाही. चिन्ह गोठवण्यात येणार याची मला खात्री होती, याने मला आश्चर्य वाटले नाही. निर्णय कोण घेत हे मला माहित नाही. शिवसेना पक्ष यामुळे अजिबात संपणार नाही उलट पक्ष जोमाने पुन्हा वाढेल.” असे पवार म्हणाले.