धनदांडग्यांना कोणाचे अभय? ग्रामपंचायत कारवाई करणार का?
संतोष पवार
सातारा – एकेकाळी स्वच्छ, सुंदर शाहूपुरी अशी ओळख असलेल्या शाहूपुरीत अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात बोकाळली आहेत. ओढे-नाले गळपटून अनेक धनदांडग्यांनी बेकायदा बांधकामांचा सपाटा लावला असून त्यांच्यावर कसलीच कारवाई ग्रामपंचायतीने केल्याचे ऐकिवात नाही. या धनदांडग्यांना कोण अभय तर देत नाही ना? असा प्रश्न शाहूपुरीकरांना पडल्याशिवाय राहत नसून ग्रामपंचायत अशा बेकायदा बांधकाम करणारांवर कारवाई करणार का? याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.
सातारा शहरालगतची आर्थिकदृष्ट्या सबल आणि मोठी ग्रामपंचायत म्हणून शाहूपुरी ग्रामपंचायतीची ओळख आहे. सुमारे 40 हजार लोकसंख्या असलेल्या या ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर व्हावे, यासाठीही मध्यंतरीच्या काळात जोरदार प्रयत्न झाले. मात्र माजी खासदार उदयनराजे भोसले आणि आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा हद्दवाढीत शाहूपुरीचा समावेश करण्यावर भर देवून त्यासाठी जोरदार प्रयत्न केले. याबाबत सध्या अद्याप शासन निर्णय झाला नाही, मात्र लवकरच साताऱ्याची हद्दवाढ होणार असून शाहूपुरीचा या हद्दवाढीत समावेश निश्चित मानला जात आहे. नगरपालिकेत शाहूपुरीचा समावेश झाला तर वेगाने या कार्यक्षेत्रात विकासकामे होऊन याठिकाणचा कायापालट होणार असल्याचे बोलले जात आहे.
सातारा शहरालगत शाहूपुरी ग्रामपंचायतीच्या हद्दीत अनेक वसाहती उदयास येताना दिसत आहेत. अपार्टमेंट, बंगले, डुप्लेक्सची उभारणी मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. ही कामे होताना नियमानुसार होतात का याची तपासणी करणे गरजेचे आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत तरी तसे होताना दिसत नाही. अनेक ठिकाणी बेकायदा बांधकामे होत असून बगलबच्चांना अभय देण्यासाठी प्रयत्न होत असल्याचा आरोप होत आहे.
काही ठिकाणी बिल्डर आणि फ्लॅटधारक यांच्यात वादविवाद निर्माण झाल्यानंतर अशा फ्लॅटधारकांना सहकार्य करण्याऐवजी त्यांना अडचणी निर्माण करणारी टोळी शाहूपुरीत सक्रिय आहे. अनेक ठिकाणी माहिती अधिकाराचा दुरोपयोग करुन लोकांना नाहक त्रास देण्याचे प्रकार होत आहेत. अशा प्रकारांना ग्रामपंचायतीने वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. अतिक्रमणांचे समर्थन कोणीही करु नये मात्र अतिक्रमणांवर कारवाई करताना आधी धनदांडग्यांच्या अतिक्रमणांवर कारवाई करावी, अशी मागणी शाहूपुरीकरांमधून होत आहे. बॅंका, पतसंस्थांची कर्जे काढून आपल्या निवासाची सोय करणाऱ्यांना त्रास होत असल्याचाही सूर आहे.
शाहूपुरी ग्रामपंचायत हद्दीत अनेक शासकीय अधिकारी, कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी जागा खरेदी करुन आपली घरे साधली आहेत. ही मंडळी मूळची शाहूपुरीतील नसल्याने ग्रामपंचायत काय करतेय याची ती सहसा विचारणाही करत नाहीत. वेळच्या वेळ कर भरायचा एवढेच त्यांना माहीत असते. मात्र आम्ही जर कर देत असल तर त्या तुलनेत निदान मूलभूत सुविधा तर आम्हाला द्या, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. विकासकामे करताना आम्हाला तुमच्या अंतर्गत राजकारणाशी काही देणेघेण नाही. आम्ही तुमच्या विरोधी वॉर्डात राहतो हा आमचा दोष आहे का? आम्ही जर कर भरत असू तर तुम्ही आम्हाला सुविधा पुरवल्याच पाहिजेत. वॉर्ड विरोधात आहे, हे म्हणणे 21 व्या शतकात योग्य वाटते का? याचाही संबंधितांनी विचार करण्याची गरज
आहे.
ओढे-नाले गळपटले हो…
शाहूपुरी ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात ओढे- नाले गळपटण्याचे प्रकार सुरु आहेत. आंबेदरेरोड, मोळाचा ओढा परिसर, तामजाईनगर, दौलतनगर, गडकरआळीचा काही भाग आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात ओढ्यांवर अतिक्रमणे होताना दिसत आहेत. खरात मटेरियल टाकून अनेक ओढे – नाले बुजवून त्यावर इमले साकारले जाऊ लागले आहेत. परिणामी डोंगर परिसरातून येणाऱ्या पाण्याला वाटच मिळत नाही. हे पाणी रहिवाशी परिसरात जात असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शाहूपुरी ग्रामपंचायत हद्दीत अशा किती ओढ्या, नाल्यांची नोंद आहे. आत्ता किती ओढे, नाले शिल्लक आहेत याची तपासणी होण्याची गरज आहे.
येथे आहेत अतिक्रमणे…
शाहूपुरी ग्रामपंचायत हद्दीत मोळाचा ओढा परिसर, गेंडामाळनाका, शाहूपुरी चौक, गडकर आळीचा काही भाग, दौलतनगरचा काही भाग, तामजाईनगर, भूविकास बॅंक ते जरंडेश्वर नाका परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे बोकाळली आहेत. नियमानुसार असणाऱ्या रस्त्यांचा काही भाग गळपटण्यात आल्याने रस्ते अरुंद होत आहेत. वाढत्या अतिक्रमणांमुळे वादविवादाचे प्रकारही होत असून याबाबत ग्रामपंचायत स्तरावरुन कारवाईची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.