गराडे, (वार्ताहर)- पुरंदर तालुका दुष्काळी जाहीर झालेला असून तालुक्यात तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. त्यात बऱ्याच धरणानी तळ गटला तर काही धरणात थोडेच पाणी असून तालुक्यातील सासवड व कांही ग्रामीण भागातील गावांना पाणी पुरवठा करणारे गराडे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्या धरणाच्या पाण्याने तळ गाठला तरी धरणात बऱ्याच शेतकऱ्यांच्या मोटरी दिसून येत आहेत. पाणी पिण्यासाठी न ठेवता सर्रास शेतीला दिले जात आहे. त्यात मोठ्या प्रमाणात गाळ साठल्याचेही दिसून येत आहे.
पुरंदर तालुक्यातील सासवड शहरासह काही ग्रामीण गावांनाही गराडे येथील धरणातून पिण्यासाठी पाणी पुरवठा केला जातो. परंतु यावर्षी पाऊस कमी झाल्याने व पाणीसाठा हा पिण्यासाठी राखून न ठेवता सर्रास शेतकरी याचा उपसा करीत आहे. त्यामुळे यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच धरणाची पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे सासवड व बऱ्याच गावाची पिण्याच्या पाणीपुरवठा योजना धोक्यात आल्या आहेत. गराडे धरणात सध्या केवळ ४० टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता अविनाश जगताप यांनी सांगितले.
तरी प्रत्यक्षात मात्र साठा कमी दिसत असून बऱ्याच मोटरी शेतीसाठीही दिसत आहेत. तरी याकडे कोणीही लक्ष देत नसून प्रत्येकाचे संबंध जोपासले जातात का, असा सवाल एका नागरिकांने केला आहे. नागरिकांना यातून किती दिवस पाणी पिण्यासाठी मिळणार व शेतकऱ्यांना शेतीसाठी किती मिळणार याचे गणितही हे प्रशासन करू शकत नसून एवढा दुष्काळ असताना पिण्यासाठी पाणी का राखून न ठेवता शेतीला पंपाद्वारे पुरवठा किती दिवस देणार की नागरिकांस पिण्यासाठी पाण्यासाठी वेठेस धरणार हाच मोठा प्रश्न आहे.
पुरंदर तालुक्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सासवड शहरवासीयांनी टंचाई स्थिती लक्षात घेऊन पाण्याचा वापर काटकसरीने करून सासवड नगरपरिषदेला सहकार्य करावे, नागरिकांनी जपून पाणी वापरावे. व पाण्याचा गरजेपुरता वापर करून पाणी वाचवावे. – डॉ. कैलास चव्हाण, मुख्याधिकारी, सासवड नगरपरिषद
सासवड शहरात पाणीकपात सुरू
यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे चारा व पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विहिरी, नाले यांचें पाणी नसल्याने कोरडे पडल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. घोरवडी धरणातून दिवे प्रादेशिक पाणीपुरवठा अंतर्गत सुपे खुर्द, पोमणनगर, पिंपळे व भिवडी या चार ग्रामपंचायतींना तसेच सासवड नगरपरिषदेला पाणीपुरवठा केला जातो.
या धरणात केवळ ६ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. शेतीला दिले जाणारे पंपाद्वारे गराडे धरणातील पाणी थांबणार का? असा प्रश्न पुरंदरवासियांना पडला आहे. सध्या सासवड नगरपालिकेने होणारा पाणी पुरवठ्यात कपात केली आहे.