सातारा – जिल्ह्यातील भाजीपाला आणि फळे पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या नाशवंत मालाचे नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या पदरी तोटा येऊ नये म्हणून शासनाच्या आदेशानुसार जिल्हा कृषी विभागाने तब्बल सात हजार क्विंटल फळे आणि भाजीपाला विक्रीसाठी समन्वय घडवून आणल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी सांगितले.
करोना संकट आणि लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तब्बल सात हजार 135 क्विंटल शेतमालाची विक्री झाली आहे. जिल्ह्यातील कृषी विभागाने यासाठी पुढाकार घेऊन शेतकरी व प्रत्यक्ष ग्राहक यांच्यामध्ये समन्वयाची भूमिका बजावली. लॉकडाऊनमध्ये गावातील आणि शहरातील आठवडी बाजार बंद होते. त्यामुळे शेतमाल शेतामध्येच पडून राहण्याची भीती होती. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेत शेतकरी व ग्राहक यांच्यात केवळ दुवा म्हणून काम करत कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून दिली आहे.
या शेतमालामध्ये चार हजार 543 क्विंटल भाजीपाला आणि दोन हजार 591 क्विंटल विविध फळांचा समावेश आहे. ही सर्व विक्री ऑनलाईन आणि थेट स्वरुपात झाली आहे. लॉकडाऊन लागू झाल्यापासून आजअखेरपर्यंतच्या केवळ तीन महिन्यांमध्येच ही विक्री झाली आहे. विविध शेतकरी गट तसेच शेतकऱ्यांना शहरातील सोसायट्यांशी समन्वय साधून लॉकडाऊन काळात फळे व भाजीपाला पुरवठा नियमित करण्याचे कामकाज कृषी विभागाने केले. शेतकऱ्यांच्या फळे व भाजीपाल्याला चांगला दर मिळाला.
शेतकरी व ग्राहक अशा दोघांचाही फायदा झाला, असे त्यांनी सांगितले. कराडचे उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ यांनी एमसीडीसीच्या अंतर्गत आमच्या शेतकरी स्वयंसहायता समूहाची नोंदणी करण्यास मदत केली. तसेच ग्राहक म्हणून पुणे येथील विविध सोसायटी मिळवून दिल्या. यानंतर या समूहामार्फत आम्ही 42 ते 43 शेतकऱ्यांचा भाजीपाला एकत्रित करुन तो पुण्यात नेऊन विकत होतो. यामधून आम्हा शेतकऱ्यांना लॉकडाऊन काळातही चांगला नफा मिळाला, असे पेरले येथील जिजामात शेतकरी स्वयंसहायता समूहाचे अध्यक्ष विजयसिंह पोपटराव भोसले यांनी सांगितले.