पाटणा-बिहार विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या राजदला जोरदार राजकीय झटका बसला. राजदच्या विधान परिषदेतील आठपैकी पाच आमदारांनी मंगळवारी सत्तारूढ जेडीयूमध्ये प्रवेश केला.
राजदला रामराम ठोकल्यानंतर पाच आमदारांनी बिहार विधान परिषदेचे प्रभारी अध्यक्ष अवधेश नारायण सिंह यांची भेट घेतली. आम्हाला स्वतंत्र गट मानून जेडीयूमध्ये विलीन होण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली. ती विनंती प्रभारी अध्यक्षांनी तातडीने मान्य केली. त्यामुळे एकूण 75 सदस्यांच्या विधान परिषदेत राजदचे संख्याबळ 3 पर्यंत खाली आले आहे. त्यामुळे लालूंच्या पत्नी राबडीदेवी यांच्यावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद गमावण्याची नामुष्की येण्याची चिन्हे आहेत. त्या पदासाठी प्रमुख विरोधी पक्षाचे संख्याबळ किमान 10 टक्के असणे आवश्यक आहे. बिहार विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणे अपेक्षित आहे. त्या निवडणुकीसाठी काही महिन्यांचाच अवधी बाकी आहे. अशातच राजदला लागलेली गळती त्या पक्षापुढील आव्हाने वाढवणारी ठरणार आहे.
रघुवंश यांनी दिला उपाध्यक्षपदाचा राजीनामा
माजी केंद्रीय मंत्री रघुवंशप्रसाद सिंह यांनी राष्ट्रीय उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने राजदला एकाच दिवशी दुसरा हादरा बसला. रघुवंश यांचा राजकीय विरोधक असणाऱ्या रामा सिंह या माफिया डॉनला राजदमध्ये प्रवेश दिला जाणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे नाराज झालेल्या रघुवंश यांनी महत्वाच्या पदाचा राजीनामा दिला. ते लालूंचे निकटवर्तीय आणि राजदच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. मात्र, लालूंचे राजकीय वारसदार तेजस्वी यादव यांच्याशी त्यांचे फारसे सख्य नसल्याचे समजते.