सातारा -पीक कर्ज वाटपात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक राज्यात आघाडीवर असल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. खरीप हंगाम 2020-21 उद्दिष्टापैकी बॅंकेने एक लाख 54 हजार 332 शेतकरी सभासदांना 850 कोटी रुपये रकमेचे वाटप केले आहे.
आजअखेर बॅंकेची पीक कर्जाची 85 टक्के वसुली झाली असून बॅंकेची 100 टक्के वसुलीची परंपरा कायम राखण्यासाठी बॅंक प्रयत्नशील आहे, असे त्यांनी सांगितले. बॅंक ग्राहकांना 320 शाखा व 953 विकास सेवा संस्थांच्या माध्यमातून बॅंकिंग सुविधा पुरविण्याचे निरंतर कार्य करीत आहे. मागील वर्षीची पूर परिस्थिती आणि करोनाचा प्रादुर्भाव, लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थ व्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.
अशा अडचणीच्या परिस्थितीत वसुली प्रोत्साहनासाठी व्याज परतावा योजना राबविणारी एकमेव बॅंक म्हणून सातारा जिल्हा बॅंकेचा उल्लेख केला जातो. जिल्हा वार्षिक पत आराखड्यात 2020-21 करिता जिल्ह्याचे एकूण उद्दिष्ठ 2200 कोटी रुपयांपैकी सातारा जिल्हा बॅंकेचे 1300 कोटी रुपये उद्दिष्ट आहे. त्यामध्ये खरीप पिकासाठी निश्चित केलेले 950 कोटी रुपयांपैकी आजअखेर 90 टक्के पूर्तता करून कर्ज वितरण करण्यात बॅंक राज्यात आघाडीवर राहिलेली आहे.
जिल्हा पतपुरवठा आराखाड्यात एकट्या जिल्हा बॅंकेचा हिस्सा नेहमीच 75 ते 80 टक्के राहिला असून प्रतिवर्षी बॅंक स्वतःच्या उद्दिष्टाची 100 टक्कयांहून अधिक पूर्तता करीत आलेली आहे. जिल्हा बॅंकेने करोनाच्या पार्श्वभूमीवरही पतपुरवठा उद्दिष्टपुर्तीमध्ये नेत्रदीपक कामगिरी करून बॅंकेची उज्वल परंपरा वृद्धिंगत केली असल्याचे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले. ते म्हणाले, “जिल्हा पतपुरवठा आराखड्यामध्ये जिल्हा बॅंकेचा पीक कर्जाचा वाटा अधिक असून ग्रामीण भागात शेती, शेतीपूरक व्यवसायात व कर्जपुरवठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली.
यामध्ये राष्ट्रीयीकृत व इतर खासगी बॅंकेपेक्षा जिल्हा बॅंकेचा सिंहाचा वाटा आहे. यामुळे जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेस खऱ्या अर्थाने चालना मिळाली आहे.”
“जिल्ह्यातील सर्व बॅंकांच्या एकूण पतपुरवठामध्ये आजअखेर जिल्हा बॅंकेने पीक कर्जाचे जवळपास 90 टक्के वाटप आणि 85 टक्के वसुली करत आदर्श कामकाज केले आहे.
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमुक्तीचा लाभ मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना 22 मे 2020 च्या शासन निर्णयानुसार व बॅंक धोरणाप्रमाणे सभासदांचे कर्ज खात्यावरील रक्कम शासन येणे दाखवून नवीन पीक कर्ज वाटप सुरु करण्यात आले आहे, असे बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी सांगितले. या योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांनी खरीप पीक कर्जासाठी नवीन कर्जाची उचल करणेसाठी नजीकच्या शाखेमध्ये संपर्क साधण्याचे आवाहन शिवेंद्रसिंहराजे भोसले व डॉ. सरकाळे यांनी केले आहे.