भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दि. 29 नोव्हेंबर रोजी केलेल्या “मन की बात’ या कार्यक्रमात सांगितले की, सुमारे 100 वर्षांपूर्वी भारतातून चोरीला गेलेली, वाराणसी येथील मंदिरातील अन्नपूर्णा देवीची मूर्ती लवकरच भारतात आणली जाणार आहे. साधारण दोन वर्षांपूर्वी कॅनडाच्या भेटीवर गेलेल्या मोदींना, तेथील सरकारने, मध्य प्रदेशातील खजुराहो येथील अतिशय दुर्मिळ अशी ‘पॅरट लेडी’ ही मूर्ती परत दिली होती. ही मूर्तीही अनेक वर्षांपूर्वी तस्करांच्या माध्यमातून कॅनडामध्ये पोहोचली होती. यानिमित्ताने भारतातील ऐतिहासिक, दुर्मिळ अशा विविध वस्तूंची तस्करी आणि त्याचे आंतरराष्ट्रीय जाळे याविषयी थोडी माहिती घेणे आवश्यक आहे.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि मुघल साम्राज्याविरोधात लढलेले कीर्तीवंत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली ऐतिहासिक भवानी तलावर लंडनच्या संग्रहालयात असल्याचे आपल्याला माहिती आहे. तसेच जगातला सर्वात महागडा समजला जाणारा “कोहिनूर हिरा’सुद्धा भारतात नसून, तो इंग्लंडमध्येच असल्याचे आपण जाणतो. याशिवाय चोरट्या मार्गाने जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या लक्षावधी दुुर्मिळ वस्तू पुरातत्त्व वस्तू संग्राहकांच्या संग्रहात आपल्याला खुले आम ठेवलेल्या पहायला मिळतात. यातील काही वस्तू परत आणण्याविषयी चर्चा होत असते; काही आणल्या जातातही; पण हे घडत असताना कित्येक वस्तू, मूर्ती आजही चोरट्या मार्गाने परदेशात लक्षावधी रुपयांना विकल्या जात असतात, याची आपल्याला कल्पनाही नसते.
ऐतिहासिक स्मारके आणि दुर्मिळ वस्तूंच्या राष्ट्रीय आयोगाच्या मते, भारतात आजच्या घडीला किमान 70 लाख दुर्मिळ वस्तू, मूर्ती, शिल्प्, दागिने, चित्रे, पुस्तके आणि असंख्य कोरीव कामाच्या वस्तू भारतात आहेत. मात्र, निवडक संग्रहालयांमधल्या सुरक्षा यंत्रणांव्यतिरिक्त बहुतांश सर्व ठिकाणी अत्यंत ढिसाळ सुरक्षा व्यवस्थेत असल्याचे आढळून येते. दोन वर्षांपूर्वी आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, भारतातून दरवर्षी किमान एक हजार दुर्मिळ वस्तू चोरट्या मार्गाने परदेशात पाठवल्या जातात आणि विविध देशांतल्या लिलावात त्या वस्तू लक्षावधी रुपयांना विकल्याही जातात.
यासंदर्भात भारतातला ऐतिहासिक व पुरातन वस्तू जतन व संवर्धन कायदा अगदीच तकलादू असून, हा कायदा असूनही अशा दुर्मिळ वस्तूंच्या चोरट्या निर्यातीला प्रतिबंध घालू शकलेला नाही. इतकेच काय, भारतीय पुरातत्त्व खात्याकडे, भारतात असलेल्या 70 लाख दुर्मिळ वस्तूंची साधी यादीही नाही. त्यामुळे या तस्करांचे चांगलेच फावते. पर्यटनाच्या निमित्ताने विविध ऐतिहासिक ठिकाणांना भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकांना हे तस्कर गाठतात आणि दुर्मिळ वस्तूंचे व्यवहार ठरवतात, असेही अनेकदा आढळून आले आहे.
चोरटे आणि लुटारू प्रवृत्तीचे लोक भारताचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा पळवतील, इथपर्यंत ठिक आहे; पण जर लोकप्रतिनिधी (आमदार-खासदार) यांनी चोरट्या वस्तूंच्या निर्यातीविरोधातला कडक कायदा तयार केला नाही, त्या कायद्याची अंमलबजावणी केली नाही, तर भारताची “विरासत’ फक्त पुस्तकात वाचण्यापुरतीच शिल्लक राहील, असे मानायला जागा आहे.
– श्रीनिवास वारुंजीकर