मुंबई – राज्यातील ग्रामीण भागातील घरकुल बांधकामांना चालना देण्यासह गुणवत्ता आणण्यासाठी राष्ट्रीय आवास दिन 20 नोव्हेंबर 2020 पासून 31 मार्च 2021 या साधारण साडेचार महिन्यांच्या कालावधीत राबविण्यात आलेल्या महाआवास अभियानास चांगले यश मिळाले, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
प्रधानमंत्री आवास योजना व राज्यपुरस्कृत घरकुल योजनांमधून अभियान कालावधीत राज्यात 7 लाख 41 हजार 545 घरकुलांचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यापैकी 3 लाख 621 घरकुले बांधून पूर्ण करण्यात आली आहेत, तर 4 लाख 40 हजार 924 घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथवर आहे. प्रगतीपथावर असलेल्या घरकुलांचे बांधकाम चालू महिन्याअखेर पूर्ण करण्यात येईल. ग्रामीण भागात अभियानाला मिळालेले यश पाहता अभियानास 1 मे 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचेही मुश्रीफ यांनी जाहीर केले.
मुश्रीफ म्हणाले, प्रगतीपथावर असलेल्या घरकुलांपैकी 2 लाख 82 हजार 232 घरकुलांचे बांधकाम जोत्यापर्यत (प्लिंथपर्यंत) तर 1 लाख 58 हजार 692 घरकुलांचे बांधकाम लिंटेलपर्यंत झाले असून ही घरकुले या महिन्यात पूर्ण होत आहेत. अभियान कालावधीत 42 हजार 657 भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली असून उर्वरित 63 हजार 343 भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देण्याची प्रक्रिया सुरु आहे.
अभियान कालावधीमध्ये 3 लाख 85 हजार 518 लाभार्थ्यांच्या घरकुलांना नव्याने मंजुरी देण्यात आली. वेळेत घरकुले पूर्ण व्हावी व बांधकामासाठी गवंड्यांची कमतरता भासू नये यासाठी गवंडी प्रशिक्षणही राबविण्यात येत आहे. यामध्ये आजअखेर 6 हजार 165 गवंडी प्रशिक्षित करण्यात आले असून 15 हजार 855 गवंडी प्रशिक्षण प्रगतीपथावर आहे.
लाभार्थ्यांना आदर्श घरकुलांबाबतची माहिती करून देण्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे डेमो हाऊसेसची उभारणी करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत 210 डेमो हाउसेसची कामे सुरु असून त्यापैकी 30 डेमो हाउस बांधून पूर्ण झाली आहेत.