पुणे – एक सप्टेंबर 2021 रोजी एलआयसी अर्थात भारतीय जीवन विमा महामंडळाने 66 व्या वर्षात पदार्पण केले. सरलेल्या 2020-21 या आर्थिक वर्षात एलआयसीने तब्बल 229.15 लाख दाव्यांचा निपटारा केला.
यामध्ये 1,47,754 कोटी रुपयाच्या व्यवहाराचा समावेश आहे. समाजातील विविध घटकांसाठी एलआयसीने 32 योजना उपलब्ध केल्या असून एलआयसी आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून ग्राहकांना कार्यक्षम देवा सेवा उपलब्ध करीत आहे.
केवळ पाच कोटी रुपयाच्या भागभांडवलावर 1956 मध्ये एलआयसीची सुरुवात झाली होती. आता एलआयसीचा वटवृक्ष इतका मोठा झाला आहे की, एलआयसीकडे 34, 36,686 कोटी रुपयाचा लाईफ फंड आहे. 2021 च्या आकडेवारीनुसार एलआयसीने 36,76,170 कोटी रुपयांची गुंतवणूक विविध क्षेत्रात केली आहे.
पहिल्या प्रीमियम उत्पन्नात एलआयसीचा वाटा 66.18 टक्के तर पॉलीसी वितरण संख्येत एलआयसीचा वाटा आताही 74.58 टक्के इतका आहे. विमा क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी खुले करण्यात आले असूनही एलआयसीने बाजारपेठेतील आपला पहिला क्रमांक कायम ठेवला आहे.
2020-21 मध्ये एलआयसीने 2.10 कोटी नव्या पॉलिसी नोंदल्या. सध्या देशात एलआयसीची आठ क्षेत्रीय कार्यालये, 113 मंडळ कार्यालये, 2048 शाखा कार्यालये कार्यरत आहेत. एलआयसीने गेल्या काही वर्षापासून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविला आहे. यासाठी इलेक्ट्रॉनिक प्रीमियम भरणा केंद्र उपलब्ध करण्यात आले आहेत.
कर्मचाऱ्यांना यासाठी डिजिटल सेवा सुविधा देण्याचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर एलआयसीने आनंदा नावाचे मोबाईल ऍप सुरू केले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना आणि ग्राहकांनाही मोठा लाभ होत आहे. स्थापनेपासून एलआयसी सामाजिक उपक्रमांमध्ये वेळोवेळी सहभाग घेत असते. एलआयसीचे काम चौदा देशांमध्ये चालू आहे. अशा कामामुळे एलआयसीला वेळोवेळी अनेक पुरस्कार मिळत असतात.