नवी दिल्ली – गॅस सिलिंडर दरवाढीवरून मोदी सरकार विरोधकांच्या टीकेचे धनी बनले असतानाच जेडीयूने ती दरवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे. जेडीयू हा भाजपचा मित्रपक्ष असल्याने त्या मागणीला महत्व आहे.
जेडीयूचे प्रवक्ते के.सी.त्यागी यांनी गॅस दरवाढीबाबत नाराजी व्यक्त केली. गॅसच्या दरात सतत वाढ होत असल्याने जनतेचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे ती दरवाढ मागे घेतली जायला हवी. जनहितासाठी सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी पाऊले उचलायला हवीत, असे ते म्हणाले.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा पक्ष असणाऱ्या जेडीयूची मागणी भाजपची गोची करणारी ठरू शकते. त्या मागणीमुळे इंधन दरवाढीबाबत सत्ताधारी गोटात अस्वस्थता असल्याचेही सूचित होत आहे.