मुंबई – जागतीक शेअर बाजारातून नकारात्मक संदेश आल्यानंतर सकाळपासून भारतीय शेअर बाजारात तुफान विक्री होऊन मुख्य निर्देशांक सव्वा दोन टक्क्यांनी कोसळले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1,145 अंकांनी कोसळून 49,744 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर राष्ट्र राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 306 अंकांनी कोसळून 14,675 अंकांवर बंद झाला.
रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी, टीसीएस या कंपन्यानी सोमवारी सपाटून मार खाल्ला. महिंद्रा, ऍक्सिस बॅंक, इंडसइंड बॅंक या कंपन्यांच्या शेअरच्या भावातही घट नोंदली गेली. या विक्रीच्या वादळात फक्त ओएनजीसी, एचडीएफसी बॅंक आणि कोटक बॅंकेच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली.
आनंद राठी या ब्रोकरेज संस्थेचे संशोधन प्रमुख नरेंद्र सोळंकी यांनी सांगितले की, चीन,जपान, युरोप, अमेरिकेतून विक्री वाढत असल्याचे दिसून आल्यानंतर भारतीय गुंतवणूकदारांनी धीर गमावला.
भारतात करोनाचे रुग्न वाढण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे काही शहरांमध्ये अंशतः लॉक डाऊन सुरू झाले आहे. त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता गुंतवणूकदारांना वाटते.
त्याचबरोबर जागतिक बाजारात क्रूडचे दर वाढत असल्यामुळे भारतातील गुंतवणूकदार सावध झाले. मुळात भारतीय शेअर बाजार निर्देशांक गरजेपेक्षा जास्त असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे अशा प्रकारचे करेक्शन अपेक्षित होते असे ब्रोकर्सनी सांगितले.