मुंबई – निर्देशांक विक्रमी पातळीवर असूनही गुंतवणूकदारांनी शुक्रवारी जोरदार खरेदी केली. स्थूल अर्थव्यवस्था बळकट आहे. त्याचबरोबर आगामी काळात विकास दर वाढण्याची शक्यता असल्यामुळे गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली. त्यामुळे शेअर बाजार निर्देशांक नव्या विक्रमी पातळीवर गेले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 593 अंकांनी वाढून 55,437 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 164 अंकांनी म्हणजे एक टक्क्याने वाढून 16,529 अंकांवर बंद झाला.
टीसीएस, रिलायन्स, इन्फोसिस, एचडीएफसी, एअरटेल, टाटा स्टील, बजाज ऑटो या कंपन्यांनी आजच्या तेजीचे नेतृत्व केले. मात्र या परिस्थितीतही पावर ग्रिड, इंडसइंड बॅंक, डॉक्टर रेड्डीज, बजाज फायनान्स, महिंद्रा या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
या आठवड्यात सेन्सेक्स 1,159 अंकांनी तर निफ्टी 290 अंकांनी वाढला आहे. बहुतांश कंपन्यांनी चांगले ताळेबंद जाहीर केले आहेत. त्याचबरोबर महागाई नियंत्रणात असून औद्योगिक उत्पादन वाढल्याची आकडेवारी काल जाहीर झाली.
त्यातच गुंतवणूकदारांचा ओढा माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राकडे कायम आहे. दूरसंचार, भांडवली वस्तू, ऊर्जा, ग्राहक वस्तू या क्षेत्राचे निर्देशांक आज दोन टक्क्यापर्यंत वाढले.
मुख्य निर्देशांकात वाढ होत असली तरी छोट्या कंपन्यांच्या शेअरचे भाव मात्र घसरत आहेत. आज मिड कॅप आणि स्मॉल कॅप काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आले. परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री चालूच असून काल या गुंतवणूकदारांनी 212 कोटी रुपयाचे शेअरची विक्री केली.
बाजार मूल्य वाढले 3.8 48 लाख कोटींनी
गेल्या दोन दिवसात शेअर बाजार निर्देशांकात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे बाजार मूल्य तब्बल 3.48 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे.
भारतातील लसीकरण वाढत असल्यामुळे आगामी काळामध्ये अर्थव्यवस्था वेग घेईल असे गुंतवणूकदारांना वाटत असल्यामुळे त्यांच्याकडून जोरदार खरेदी होत आहे. मात्र आता गुंतवणूकदार सावध होण्याची शक्यता आहे.